मनाचिये गुंफी ह्या डॉ. प्रकाश साठये यांच्या पुस्तकाला पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेली प्रस्तावना.

(नोंद - हा लेख "मनाचिये गुंफी" ह्या पुस्तकाचे लेखक मान्यवर डॉ. प्रकाश साठये यांच्या पुर्वपरवानगीने इथे प्रकाशित करत आहे. सदर लेखाची परवानगी घेण्याचे मोलाचे कार्य आणि संपुर्ण लेख मराठीत टंकुन देण्याचे अत्यंत मेहनतीचे काम आमचे एक जालमित्र आणि पु.ल.प्रेमी श्री. नितीन येमुल ह्यांनी केले आहे. मराठीत टंकण्यासाठी श्री नितीन येमुल यांना त्यांच्या पत्नी सौ.लता येमुल आणि त्यांचे सुपुत्र अमर येमुल यांची बहुमोल साथ लाभली. ह्या लेखासाठी डॉ. प्रकाश साठये आणि श्री. नितीन येमुल यांच्या परिवाराचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत तरिही आम्ही त्यांचे मनापासुन आभारी आहोत. सर्व श्रेय ह्या दोन मान्यवरांचेच.)

‘मन हाच माणूस’
-- पु. ल. देशपांडे

माणूस ह्या प्राण्याची व्याख्या करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. अजूनही ते चालू आहेत. योगवासिष्ठाने ह्या विषयावर एक निर्णय देऊन टाकला आहे की ‘मन एव मनुष्य:।’ मन हाच माणूस. ही व्याख्या माणसाच्या बाह्य वर्णनाशी जुळणारी नसली तरी आपण जेव्हा अमक्या अमक्या माणसाला ओळखतो असं म्हणतो त्यावेळी त्याच्या केवळ शारीरिक घडणीशी परिचित आहोत एवढंच सांगत नाही. त्याच्या मनाच्या घडणीशी आपल्या त्या ओळखण्याचा संबंध असतो. आपला निरनिराळ्या माणसांशी परिचय असतो म्हणजे निरनिराळ्या मनांशी परिचय असतो आणि निसर्गानं स्वत:च्या निर्मितीची हुबेहूब नक्कल, प्रत न काढल्यामुळे प्रत्येक सर्वसाधारण मनाप्रमाणे असूनही त्यात एक निराळेपण असतं. हे आपलं विशिष्ट मन घेऊनच मनुष्य जन्माला येतो आणि त्यातूनच त्याचं चारचौघांतला एक असूनही एक प्रकारचं निराळेपण दिसून येतं. ह्या निसर्गदत्त किंवा प्राकृतिक निराळेपणामुळे आपण व्यक्ति तितक्या प्रकृती असं म्हणत असतो. मनाची ठेवण उपजत असल्यामुळे एखाद्या प्रसंगी एखाद्याचं वागणं विचित्र वाटलं की ’स्वभावो दुरतिक्रम:’ असे हताश उदगार काढून त्या विचित्रपणाचा संबंध मनाच्या घडणीशी जुळवतो. म्ह्टलं तर आपल्या ताब्यात राहील आणि म्ह्टलं तर बेफाम उधळेल अशा ह्या मन नावाच्या शक्तीशी आपली आयुष्यभर झुंज चालू असते. त्यात पुन्हा माणूस हा काही एकटा जगत नाही. त्याला समाजातला एक घटक म्हणूनही जगावं लागतं; त्यामुळे व्यक्ती म्हणून आपल्या स्वत:च्या विचारांतून स्वत:चा विकास घडवण्याच्या प्रयत्नात असताना सामाजिक परिस्थितीतून होणाऱ्या मनावरच्या संस्कारांचाही त्याच्यावर परिणाम घडत असतो. आपल्या मनाची मालकी सर्वस्वी आपल्या हाती नाही. त्याच्यावर सत्ता गाजवणाऱ्या इतर अनेक अदृश्य सामाजिक शक्ती आहेत हे त्याला उमजतं. म्हणूनच मनाची सुदृढता कमी होऊन ते रोगग्रस्त व्हायला लागलेलं दिसल्यावर त्याच्यावर जन्मजात स्वभावाचे आणि परिस्थितिजन्य संस्कारांचे आघात ह्या दोन्हींची दखल घेऊन मनोरुग्णावर इलाज करावा लागतो.

मनाचा तोल कुठल्या पायरीपायरीनं ढासळत जातो याचं अतिशय मार्मिक वर्णन गीतेतल्या, ध्यायतो पुंस: संगस्तेषूपजायते, ह्या आणि त्यानंतरच्या श्लोकांत आढळते. साऱ्या मनोविकृतीचं मूळ विषयवासनेत तिथे दाखवलं आहे. आणि त्यानंतरच्या काम-क्रोध-संमोह-स्म्रतिविभ्रम, बुध्दिनाश आणि विनाश ह्या अवस्था आजच्या मनोविकारतज्ज्ञांनीही स्वीकारलेल्या आहेत. मनोरुग्णतेचा इतका तर्कशुध्द विचार इतक्या प्राचीन काळी होऊनही त्यानंतर त्या विषयावर संशोधन किंवा शास्त्रीय स्वरुपातलं लेखन आणि ग्रंथनिर्मिती दुर्देवाने देशात झालेली नाही. उलट इतर व्याधीसारखी मनोरुग्णता हीदेखील एक इहलोकी घडणाऱ्या संस्कारातून घडणारी व्याधी आहे असं न मानता हा कुठल्या तरी देवदेवतांचा कोप आहे, आकाशस्थ ग्रहांनी दिलेली पीडा आहे, भूतपिशाच्च बाधा आहे अशा समजुतीनी ह्या व्याधींचा बुध्दिनिष्ठ, वैज्ञानिक प्रयोगनिष्ठ असा पाठपुरावा केला गेलाच नाही. युरोपदेखील अशा प्रकारच्या जादूटोण्याच्या उपचारात फसला नव्हता असं नाही. परंतु युरोपात वैचारिक आणि सांस्कृतिक समाजप्रबोधनाची क्रांती घडविली गेली. अंधश्रद्धेवर पोसलेल्या गेलेल्या आणि माजलेल्या धर्मपीठाना आणि त्यांनी प्रसृत केलेल्या विवेकशुन्य रुढींना धडका देण्याचं कार्य ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या विद्वानांनी सुरू केलं. त्यातच शरीरचिकित्सेच्या जोडीला मनाची चिकित्सा सुरू झाली. मनाच्या व्यापाराची शास्त्रशुध्द तपासणी व्हायला लागली. मनोरुग्णावस्था येणं म्हणजे मेंदूच्या दळणवळणात अडथळा निर्माण होणं. हा अडथळा कुठे निर्माण होतो? का होतो? तो अडथळा काढून टाकण्याचे भौतिक उपाय काय ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची धडपड सुरू झाली. अनेक प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत संशोधकांनी धर्मांध सत्ताधीशांची गैरमर्जी ओढवून घेतली. काहीजण देशोधडीला लागले पण प्रयत्नात खंड पडला नाही. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात निसर्गाची नाना प्रकारची कोडी बुध्दीनं आणि प्रयोगशाळेत अहोरात्र चालवलेल्या परीश्रमामुळे हळूहळू सुटायला लागली. निसर्गाला नुसतीच एक प्रचंड शक्ती मानून किंवा ह्या निर्मितीचा हवाला देव या कल्पनेवर टाकून त्याची आंधळेपणाने आणि भेदरलेल्या मनाने पूजाअर्चा करीत न बसता त्या निसर्गाचे वागण्याचे नियम शोधून काढले. त्या शक्तीचं बलस्थानही ओळखलं आणि मर्मस्थानही शोधून काढलं. आकाशातल्या विजेचं भयभीत मनानं नुस्तं स्त्रोत्र न गाता तिला वठणीवर आणून माणसाच्या ऐहीक सुखासाठी, समृध्दीसाठी कशी राबवता येईल याचा विचार सुरू केला. आणि वीज ही माणसाघरी राबू लागली. अग्निदेवतेची प्रार्थना करायची गरज उरली नाही. बटन दाबलं की ते कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या माणसानं दाबलं ह्याचा विचार न करता दिवा पेटायला लागला. पंखा फिरायला लागला. विजेकडून पाणी तापवूनही मिळायला लागले. थंडगार करूनही मिळायला लागले. ह्या भौतिक शोधांसारखाच माणसाच्या मनाचा शोध सुरू झाला. मेंदूची रचना तपासायचे नवे प्रयत्न सुरू झाले. मनोविज्ञानाच्या क्षेत्रात ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉईड याने प्रचंड क्रांती घडवून आणली. आणि वैद्यक शास्रात मनोवैद्यकाला महत्वाचं स्थान प्राप्त झालं. माणसाच्या मनोव्यापाराच्या तळाशी एखाद्या पाणबुडयाप्रमाणे बुडी मारुन मनोरुग्णतेचं मूळ तिथे सापडतं की काय याचा शोध सुरू झाला. पुष्कळ वेळा ह्या बिघाडांचं मूळ लैंगिक वासनांच्या पूर्ती-अपूर्तीशी निगडीत असल्याचं दिसून आलं. तोटीतून वाहणारं पाणी कुठेतरी एखादा चोथा अडकून तुंबावं आणि त्या पाण्याची घाण सुटावी त्याप्रमाणे मेंदूतही पूर्वायुष्यातील अप्रिय घटनांचा चोथा अडकून तो भाग अकार्यक्षम होतो. त्यातून स्मृतीभंश होतो आणि माणूस भ्रमिष्ट होतो. त्याचा विवेकाचा लगाम सुटतो असं दिसून यायला लागलं. माणसाना पडणाऱ्या स्वप्नांचं वर्गीकरण करून त्यावरून मनोरुग्णावस्थेची चिकित्सा सुरू झाली. हजारो रूग्णांची तपासणी झाली. त्यातून मिळालेल्या माहितीतून व्याधींच्या कारणांची छाननी करण्यात आली. त्यावर इतर व्याधींना द्यावयाच्या औषधाप्रमाणे औषधोपचार सुरू झाले. मनोरुग्ण विज्ञानाची एक शाखा वैद्यकाला जोडली गेली.

इंग्रजी अमलानंतर भारतात युरोपीय पद्धतीच्या वैद्यकीय चिकित्साशास्त्रांच्या अभ्यासाला सुरूवात झाली. आयुर्वेद-युनानी वगैरे चिकित्साशास्त्राची जागा ऍलोपथीने घेतली. वैद्यक इंग्रजीतून शिकवलं जाऊ लागलं. त्यामुळे ज्ञानाच्या त्या शाखेतल्या साऱ्या ग्रंथांची निर्मिती इंग्रजीतून झाली. भारतीय भाषांतून हे ज्ञान आलंच नाही. वास्तविक मंत्रतंत्र, जादूटोणे, अंगारे-धुपारे वगैरे अडाणी उपचार हे आपल्या देशात शारीरिक आणि मानसिक व्याधींनी पछाडलेल्या माणसांवर फार मोठया प्रमाणावर होतात. अशा वेळी प्रयोगशाळेत रीतसर परीक्षा करून सिद्ध झालेलं हे आधुनिक वैद्यक विज्ञान भारतीय भाषांतून लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. पण डॉक्टरी व्यवसाय करणाऱ्यांना धंदा करण्यात अधिक रस होता. हे नवं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवावं, अंधश्रद्धेतून केल्या गेलेल्या आसुरी उपचारांच्या भयानक परीणामांची जाणीव करून द्यावी असं अगदी तुरळक अपवाद सोडले तर आमच्या भिषग्वर्यांना वाटलं नाही. आधुनिक वैद्यक-विज्ञानावरची मराठीतली ग्रंथनिर्मिती एका कपाटात मावण्याइतपतच आहे.

आणि इंग्रजीत दरसाल हजारो ग्रंथाची भर पडते आहे. ही पुस्तकं काही मुद्रणालयात जन्माला येत नाहीत. त्यासाठी ज्ञानाची ओढ असलेल्या संशोधकवृत्तीच्या आणि ते ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याची तळमळ असलेल्या विज्ञान क्षेत्रातल्या उपासकांची गरज असते. निसर्गाची ही कोडी सोडवून सत्य उजेडात आणण्याची बुध्दीनिष्ठ धडपड करणाऱ्या सत्यसंशोधकांची फळी उभी रहावी लागते. आपापल्या प्रयोगशाळांत रात्रंदिवस तप करणारे ऋषी असावे लागतात. असले तपस्वीच अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती करीत असतात. दुर्दैवाने आधुनिक ज्ञानविज्ञान आपल्या लोकांना कळेल अशा भाषेत सांगायाची ओढ असलेली माणसं आपल्या देशात अपवाद म्हणूनच आहेत. त्याबरोबर वैद्यकातलं नवं संशोधन काय आहे याविषयी काहीतरी जाणून घेण्याची इच्छा असलेला वाचकही इथे नाही. असल्या ह्या निराशाजनक आणि जिथे वाचकवर्गच कमालीचा मर्यादित आहे अशा परिस्थितीत मराठीतून हे शास्त्रीय ज्ञान देण्याचा खटाटोप कोण करील? पण प्रत्येक ठिकाणी अपवाद असतात. डॉ. प्रकाश साठये हा असाच एक अपवाद आहे. मनोवैद्यकाच्या क्षेत्रात तो गेली सतरा-अठरा वर्षे आहे. अनुभव आणि अभ्यास अशा दुहेरी आधारांमुळे त्याला हा ग्रंथ लिहिण्याचा अधिकार आहे. पण ह्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहावी असं त्याला का वाटले ते मात्र मला कळत नाही. मी मनोवैद्यकाचा अभ्यासक नाही. किंवा मनोरुग्ण्ही नाही. (अशी निदान माझी समजूत आहे.) मला प्रयोगशाळेत उंदीर वापरतात तसं प्रकाशनं वापरलं असाव. म्हणजे मला मराठीतून हे पुस्तक सुबोध वाटलं तर सर्वसाधारण वाचकाला ते समजेल असा त्याचा कयास असावा. ते काहीही असो, सुरुवातीपासून अखेरपर्यंत मी हे पुस्तक उत्सुकतेनं वाचलं. मात्र प्रकाश वैद्यकाचा विद्यार्थी होता त्या काळापासून त्याचा आणि माझा स्नेह आहे. व्यवसायात असूनही त्यानं आपली अध्ययनवृत्ती ताजी ठेवली आहे. समोर येणाऱ्या रोग्याकडे केवळ अर्थोत्पादनाचे साधन म्हणून न पाहता आपल्या वैद्यकविद्येला मिळालेलं नवं आव्हान म्हणून तो पाहण्याची त्याची दृष्टी आहे. त्याच्याकडून मी त्या मनोविकारांनी पछाडलेल्या रुग्णांच्या व्यथांचा इतिहास ऐकलेला आहे त्यावरुन मी हे सांगतो. रुग्णांच्या नावांची गुप्तता ठेवून त्यानं सांगितलेल्या कथांतून प्रत्येक मनोरुग्ण हे नवं आव्हान कसं आहे याची कल्पना येते. रोगाची कारणं किती विविध असतात, त्याची वाढ निरनिराळ्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक स्तरावर जगणाऱ्या रुग्णांत किती निरनिराळ्या कारणांनी होते ते ऐकल्यावर आश्चर्य वाटतं. वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या जोडीला तज्ज्ञांच्या अनुभवातून निर्माण झालेल्या ह्या विषयावरच्या ग्रंथांचं वाचन वैद्यकासारख्या व्यवसाय आणि सेवा अशा दुहेरी स्वरुपाच्या कार्यांना किती आवश्यक आहे याची जाणीव होते.

आज दुर्दैवानं वैद्यकीय व्यवसाय ही इतर वस्तूंच्या दुकानदारीसारखी दुकानदारी झाली आहे. रुग्ण हे डॉंक्टरांच्या उत्पन्नाचे साधन एवढंच मानलं जातं असं वाटायला लागलं आहे. काहींनी तर धनाढ्य देशीविदेशी औषध निर्मात्यांचे दलाल होण्यात आणि बेसुमार द्रव्य कमावण्यात स्वत:च्या वैद्यकीय व्यवसायाची इष्ट फलश्रुती आहे असं मानलं आहे. अशा ह्या बाजारात आपल्या विषयाचे सतत अध्ययन करुन, आपल्या चिकित्सालयात येणाऱ्या रुग्णांच्या परिस्थितीची टिपणं ठेवून, त्यांची छाननी करुन मनोवैद्यकावर, जिथे खपाची खात्री नाही असा देशी भाषेत ग्रंथ लिहिण्यात वेळ घालवावा हीच मुळात कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. पण ह्या ग्रंथाचं स्वागत केवळ कौतुकापोटी करावं इतका हा सामान्य खटाटोप नाही. ह्या ‘ मनाच्या गंफेत ’ ज्ञानमय प्रदीप हाती धरुन फेरफटका मारलेला आहे. अनेक अज्ञात गोष्टी अंधारातून उजेडात आणल्या आहेत. आणि ह्या मन नावाच्या अजब गुहेतली गुह्यं अतिशय साध्या भाषेत, तज्ज्ञतेचा बडेजाव न मिरवता उलगडून दाखवली आहेत. विषय कळलेला असला की भाषा आपोआप साधी होते. रोगाची कारणं, लक्षणं, त्यावरची उपाययोजना, मनोविकारांवरच्या संशोधनांची माहिती, ह्या विकाराविषयीचे गैरसमज, सामाजिक दडपणामुळे ही व्याधी लपवण्याकडे आणि योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेण्याकडे असलेली प्रवृत्ती, ह्या असल्या लपवाछ्पवीतून उदभवणारी भयानक परिस्थिती, अशा निरनिराळ्या अंगांनी प्रकाशनं ह्या शास्त्राचा परिचय करून दिला आहे.

डॉं. प्रकाशनं ह्या ग्रंथात मनोरुग्णाचा एक व्याधिग्रस्त व्यक्ती म्हणून विचार केला आहे. तसा तो सामाजिक परिस्थितीचे संस्कार घेणारा एक समष्टीतला घटक असल्यामुळे जनमनोवैद्यकाचाही ऊहापोह केला आहे. ह्या दृष्टीनं प्रस्तुत ग्रंथातलं "सामाजिक प्रश्न आणि जनमनोवैद्यक" हे प्रकरण मला फार महत्त्वाचं वाटतं. मानसिक संतुलन बिघडायला अनेक कारणं असतात. त्यात आपल्या कुटुंबपध्दतीत आढळून येणारा सासुरवास आणि त्यातून उदभवणारी स्त्रियांच्यातली मनोरुग्णता हाही प्रकार आहे. ‘व्यसनाधीनता’ हाही मनोविकारांच्या वाढीला भरपूर प्रमाणात हातभार लावणारा प्रकार आहे. स्वर्ग-नरकाच्या कल्पना, पापाविषयींचा धार्मिक धाक हे सामाजिक घटक व्यक्तीच्या मानसिक दौर्बल्याला कारणीभूत होतात. म्हणून मनोविकारावरील उपचारयोजनेत समाजाची बुद्धिनिष्ठ चिकित्सेच्या दिशेनं वाटचाल होणं हेही अत्यंत आवश्यक आहे.

मनोव्यापाराविषयींचं योग्य शिक्षण मिळालं तर कितीतरी माणसं मनोरुग्णतेच्या अवस्थेला पोहोचण्याआधी बचावली जातील अशी हे पुस्तक वाचताना खात्री पटते. मनोव्यापारातील सर्व प्रश्नांचे उलगडे झाले आहेत असा मनोवैज्ञानिकांचा दावा नाही. मंतरलेल्या पाण्यानं किंवा अंगाऱ्या धुपाऱ्यांनी साऱ्या आधीव्याधी नष्ट करता येतात अशा प्रकारच्या किंवा गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून मधुमेहापासून ते हृदयविकारापर्यंत सर्व रोगांवर विजय मिळवता येतो अशा प्रकारचा तर्कशून्य दावा विज्ञान करत नाही. विज्ञान आपल्या मर्यादा, आपल्या त्रुटी मान्य करतं. आपले सिध्दांत पुन्हा पुन्हा तपासून पाहतं आणि सत्याचा शोध चालू ठेवतं. मनाच्या गुंफेत अजूनही कितीतरी अज्ञात प्रदेश आहेत. मेंदूच्या रचनेचा आणि कार्यपद्धतीचा शोध घेण्याचं कार्य युरोपात आणि अमेरिकेत वर्षानुवर्षं चालू आहे. आजही दर महिन्याला ‘मेंदू’ या विषयावरच्या नव्या संशोधनाचे निबंध प्रसिद्ध होत असतात. अंतर्मनाची फ्रॉईडनं कार्यपद्धती शोधून काढल्यावर आणि स्वप्नांचे अन्वयार्थ लावण्याच्या रीतीवर कितीतरी साधकबाधक चर्चा झाली. मार्क्सनं साऱ्या सामाजिक अनर्थाचं मूळ हे अर्थव्यवस्थेचं संतुलन बिघडण्यात आहे हा सिद्धांत मांडून प्रचंड विचारचक्र परिवर्तन ज्याप्रमाणे घडवून आणलं त्याचप्रमाणे फ्रॉईडने लैंगिक भूक हीच मनोव्यापारावर नियंत्रण ठेवणारी शक्ती असल्याचा सिद्धांत मांडून मनोरुग्णांसाठी नवीन उपचारपद्धती शोधून काढली. सारं जग हादरून टाकणाऱ्या ह्या दोन्ही सिद्धांतांचा स्वीकार वैज्ञानिकांनी आंधळेपणानं करून ते स्वस्थ राहिले नाहीत. त्यातल्या त्रुटी शोधण्याचंही कार्य त्यांनी चालू ठेवलं आहे. ज्ञानाच्या उपासनेला खंड मानवत नसतो. मेंदूच्या कार्याचं रहस्य शोधण्यासाठी चाललेले पाश्चात्त्य देशांतल्या वैद्यक शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नात येणाऱ्या अनुभवांचं लेखन केलेले ग्रंथ वाचताना आपण थक्क होऊन जातो. पण हे सारं ज्ञान इंग्रजीत आहे. आपल्या देशात इंग्रजी वाचणारांची संख्या शेकडा दोन तरी आहे की नाही याची मला शंका आहे. अशा परिस्थितीत माणसांचे जगणे रोगहीन करण्यासाठी लिहिलेले ग्रंथ त्यांना कळेल अशा भाषेत जनसमुदायापर्यंत नेऊन पोहोचविणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचं खूप चांगलं स्वागत झालं पाहिजे.

रोगाचं कारण सापडलं की रोग नव्वद टक्के बरा झाला असं समजावं. त्यासाठी मनोविकार हा सुद्धा देहविकारासारखाच विकार आहे आणि कित्येक देहविकारांचं मूळसुद्धा मनोविकारात आहे हे सूत्र लोकांच्या मनात ठसवायला हवं. साऱ्या दु:खांचं कारण ‘मन अनावर’ असल्याचं संतांनी सांगितलं आहे. पण मनाच्या त्या अनावरपणाचं विश्लेषण विज्ञाननिष्ठ वैद्यक शास्त्रज्ञांनी करून अनेक मनोरुग्णांना वेडाच्या दरीतून वर काढून जीवदान दिलं आहे. अशा ह्या शास्त्राची उत्तम ओळख करून देणार हा ग्रंथ डॉं. प्रकाश साठये यांनी मराठी वाचकांपुढे ठेवला आहे. तो वाचायला आपण स्वत: मनोरुग्ण किंवा एखाद्या मनोरुग्णाचा आप्त असायची जरुरी नाही. आपल्या स्वत:च्या मनोव्यापाराची माहिती होण्यासाठी आणि ते संतुलन न बिघडण्यासाठी घ्यायच्या खबरदारीसाठी देखील हा ग्रंथ वाचायला हवा.

ह्या विषयाला आवश्यक अशी तंत्रिक परिभाषा मराठीत रूढ झालेली नाही; त्यामुळे कानावर पडणाऱ्या इंग्रजीतील ह्या विषयाशी संबंधित असणाऱ्या शब्दांना मराठीतले प्रतिशब्द सांगणारा छोटासा पारिभाषिक शब्दकोशही ह्या संग्रहात दिलेला आहे. त्याचाही सर्वसामान्य वाचकाला लाभ होईल.

शरीर ढसळलं तरी जोपर्यंत मन ढासळलेलं नाही तोपर्यंत मनुष्य आपलं व्यक्तिमत्त्व टिकवून असतो. शहाण्यातला शहाणा, प्रकांड पंंडित, कलाचतुर, उमद्या स्वभावाचा, उत्तम रसिकवृतीचा, कशाही योग्यतेचा माणूस असला तरी मनाचं संतुलन बिघडलं की तो चैतन्यहीन पालापाचोळा होऊन गेलेला असतो. म्हणूनच मन सुदृढ ठेवण्यावर संतांनीही भर दिला आहे. ‘मन करा रे निश्चल’ असा उपदेश शतकानुशतके चालू आहे. एकदा मनावरचा ताबा उडाला की माणूस आणि आवेग आवरता न येणारा पशू ह्यात फरक उरत नाही. म्हणून पुन्हा म्हणावसं वाटतं मन एव मनुष्य:। त्या मनाचे व्यापार, त्या मनाची कार्यपध्दती समजावी ह्या हेतूने हे पुस्तक लिहीले आहे. माणसाला आपण आत्महत्या करतो आहो हे देखील कळू नये अशा अवस्थेपर्यंत नेणाऱ्या मानसिक व्याधींच्या निरनिराळ्या प्रकारांसंबंधी माहितीपूर्ण असं हे पुस्तक मराठीतून लिहिल्याबद्दल मी प्रकाशचं अभिनंदन करतो.

पु. ल. देशपांडे
पुणे, २३-३-८६

Wednesday, November 09,2005
Maharashtra Times

'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या आठवणींत बुजुर्ग रमले होते आणि त्या ऐकताना श्ाोते हेलावून जात होते. पुलंचा परिसस्पर्श लाभलेल्या अनेकांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले होते. पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने अकादमीच्या रवींद नाट्य मंदिरात 'आठवणी पुलंच्या' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

अभिनेत्री आशालता म्हणाल्या, 'पुलंनी अनेकदा माझ्या हातचं जेवण खाल्लंय. ते म्हणायचे, तुझ्या हातचं कारलं खातानाही कुर्ल्या खाल्ल्यासारखं वाटतं!' पुलं 'मत्स्यगंधा'च्या प्रयोगाला आले असता त्यांना जाणवलं की, रामदास कामतांबरोबरच्या प्रसंगात आशालता यांच्या डोळ्यांत पाणी येतंय. मध्यंतरात ग्रीनरूममध्ये आल्यावर त्यांनी विचारलं तेव्हा आशालता यांनी सांगितले की, आज सकाळीच रामदास कामत यांची आई वारली आणि तरीही ते प्रयोगाला आले! तेव्हा पुलं म्हणाले, कामतांचं बरोबर आहे. कलावंताला नातं नसतं. ही आठवण सांगत आशालता म्हणाल्या, 'पुढे जेव्हा माझ्या आयुष्यात दु:खाचे प्रसंग आले, तेव्हा भाईंचं हे वाक्य आठवायचं आणि मी कामाला लागायचे!'

पुण्यात पालिकेने बालगंधर्व रंगमंदीर बांधायला घेतलं, तेव्हा त्यावर टीका करणारे आपणही होतो आणि 'साधना'तून पुलंवर टीका करणारे लेखही लिहिले होते. त्याने 'साधना'चे संपादक वसंत बापट अस्वस्थ झाले. पण पुलं मात्र त्याचा कडवटपणा न ठेवता आपल्याशी वागले आणि विरोधभक्तीतून निर्माण झालेलं हे नातं पुढे फुलतच गेलं, असं प्रसिद्ध लेखक अनिल अवचट यांनी सांगितलं.

प्रफुल्ला डहाणूकर, श्ाुती सडोलीकर आणि विजय तारी यांनीही पुलंच्या हृद्य आठवणी सांगितल्या.

"पुलंच्या घरी गेल्यावर त्यांनीच दार उघडलं आणि चक्क मला ओळखलं. त्यामुळे मी पैज जिंकलो...' विलेपार्ले येथे राहणारे रत्नाकर खरे ही गोष्ट सांगू लागले आणि त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून "पु. ल." पुन्हा भेटले! ........

"पु. लं.'च्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस पार्ल्यात गेले. या दिवसांत पुलंच्या बरोबर वावरलेल्या काही जवळच्या कुटुंबांपैकी एक खरे कुटुंबीय. त्यापैकी रत्नाकर खरे यांना "पु. लं.' विषयी विचारले असता त्यांनी सांगितले, "


"पु. ल. आम्हाला बऱ्याच वर्षांनंतर ओळखतील का, याविषयी पैज लागली. पुलंनी जर ओळखले नाही, तर मी सर्वांना आइस्क्रीम द्यायचे असे ठरले होते. पुलंनी माझ्या वडिलांसमवेत (माधव खरे) आम्हाला पाहिले होते. पुण्याला पुलंच्या घरी गेलो. सुदैवाने त्यांनीच दार उघडले आणि एकदम आम्हाला जवळ घेऊन, आमची नावानिशी चौकशी केली. आम्हाला त्याचे फारच अप्रुप वाटले. आम्हाला सर्वांना पुलंनी आत घेतले व माझ्याकडे गाणे म्हणण्याची फर्माईशही केली!''


पुलंचे संगीतप्रेम तर जगजाहीर आहे. त्याबद्दल रत्नाकर खरे म्हणाले, " "त्या वेळी आमच्याकडे ग्रामोफोन होता. पुलंना नवी रेकॉर्ड दिसली की ते आमच्याकडे ती घेऊन येत. मग ग्रामोफोनवर ती ऐकण्याच कार्यक्रम असे. बेगम अख्तर यांची एक तबकडी आमच्याकडे बसून पुलंनी इतक्‍या वेळेला ऐकली, की तेच गमतीने म्हणायचे, "आता मला भीती वाटायला लागलीय, की या तबकडीच्या पाठीमागचेही आपल्याला ऐकू येईल की काय!''

पुलंच्या "असा मी असामी'मध्ये सरोज खरे ही व्यक्तिरेखा आहे. हे नाव ज्यांच्यावरून घेतले त्या सरोज रानडे या योगायोगाने पार्ल्यातच भेटल्या. त्यांच्याशी बोलताना खरेच असे जाणवले, की पुलंनी वर्णन केलेल्या सरोज खरे यांच्याशी सरोजताईंचे खूप साम्य आहे. सरोज रानड्यांच्या मते सरोज हे नाव भाईंनी माझ्या नावावरून घेतले व खरे हे आडनाव माधव खरे यांच्यावरून घेतले. सरोजताई व त्यांचे पती शरद रानडे हे ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत.

पुलंविषयीच्या आठवणी घेऊन सांताक्रूझच्या स्वाती महाजन विवाहानंतर स्वाती लिमये होऊन हैदराबादला गेल्या. स्वातीताई पुलंविषयी सांगू लागल्या, ""१९८७ मध्ये मी दहावीसाठी त्यागराज क्‍लासेसमध्ये पार्ल्याला जात होते. क्‍लास संपल्यावर आम्ही मुली टंगळमंगळ करत असू. हा क्‍लास नेमका पुलंच्या बगल्यामागेच होता. एकदा माझ्या मैत्रिणीचे लांबसडक केस पुलंच्या बंगल्याच्या कुंपणात अडकले. ती म्हणाली, आता त्या आजोबांच्या शिव्या खाव्या लागणार. पुलंनी बाहेर येऊन पाहिले आणि ते तिला म्हणाले, मुली निसर्गाची देणगी अशी निष्काळजीपणे नाही वापरायची. अशी देणगी फार थोड्या जणींना मिळते. त्यामुळे ती निगुतीने सांभाळायची असते.''

पु.ल. या दोन अक्षरांमध्ये सामावलेल्या एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाविषयीच्या या काही मनात रेंगाळणाऱ्या आठवणी. अशा आठवणींच्या माध्यमातून पु.ल. आज पुन्हा भेटले; काहीसे अप्रकाशित... पण तरीही खास "पुलकित'च!

वैभव वझे - सकाळ वृत्तसेवा
मुंबई.

' पुलं'चं लिखाण, त्यांचे परफॉर्मन्सेस आजही अनेकांना आनंद देतात, क्षणभर का होईना त्यांच्या निखळ विनोदातून जगण्यातल्या दैनंदिन विवंचनांचा विसर पडतो... 'पुलं'च्या या मोठेपणाची जाणीव मराठीतून एमए करूनही केशकर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या या लेखकाला आहे. म्हणूनच कामाच्या निमित्ताने त्यांचा 'पुलं' आणि सुनिताबाईंशी जो काही संबंध आला, ती त्यांना त्यांच्या आयुष्यातील फार मोलाची कमाई वाटते. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात, निमित्त पुलंच्या नुकत्यात पार पडलेल्या जयंतीचं...

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ; विद्याथीर् सहाय्यक समितीचा एक विद्याथीर् दुकानाचे दार उघडून आत आला. 'तुम्हाला पु. ल. देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे.' -त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून 'सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत'- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गिऱ्हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला. आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला 'हो लगेच निघतो' असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गिऱ्हाईकाकडे आरशात पाहू लागलो. त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. 'पुलं'चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गिऱ्हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता. 'राहू द्या होे; माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही.' त्याच्या या वाक्यातून 'पुलं'बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मागीर् लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली. त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महषिर् देवधरांच्या घरी केस कापावयास जात असे तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता.

थोड्याच वेळात मी 'रुपाली'मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि 'या' म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले. 'थोडावेळ बसा; भाई जरा नाश्ता करतो आहे' असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या. आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते. अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो. इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुचीर् देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. 'चंदकांत, यांचे केस बारीक करून टाका' म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहीण्यात गर्क झाल्या. त्यांचे लक्ष नाही असे पाहून 'फार लहान करू नका, थोडेच कापा' पुलं माझ्या कानात कुजबुजले. माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलिकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या. पहिल्याच दिवशी पुलं त्यांना 'पुलं-स्वामिनी' का म्हणतात याचा अर्थ उमगला. त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतींच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.

केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व 'वा छान!' म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सवोर्च्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गंुडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले. 'चंदकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका' त्यांनी आज्ञा केली. मला जरा विनोद करावासा वाटला. मी म्हटलं, 'नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की 'हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणाऱ्या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील.' त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या 'तो काय येशुख्रिस्त वगैरे आहे की काय?' मी मनात म्हणालो 'मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सार्मथ्य त्यांच्या लेखणीत होते. म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता. शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो, 'एक आनंदाचं देणं'. पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे... '

- चंदकांत बाबुराव राऊत
शनीवार, नोव्हेंबर ११ २००६
महाराष्ट्र टाईम्स

(स्मिता मनोहर आणि मनोज प्रभू यांनी श्री.उमाकांत व रमाकांत देशपांडे यांची घेतलेली मुलाखत - दि. ४ जून २००२)

'५, अजमल रोड, त्र्यंबक सदन'.... पार्ल्यात पोहोचलो आणि 'त्र्यंबक सदना'च्या दिशेनी आम्ही भारावल्यासारखे चालू लागलो. गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न.....पु.लं.च्या घरी जायचं... जे कदाचित स्वप्नच राहिल असं वाटत होतं, ते आज पूर्ण होत असल्याचा आनंद, बरीचशी उत्सुकता, पण एक हुरहुर अशा संमिश्र भावना मनात दाटून येत होत्या. पु.लं.चं बालपण, त्यानंतरचं समृध्द जीवन याच्या अनेक वर्षांच्या आठवणी जिथे दडल्या आहेत, तिथे आम्ही आज जात होतो, पण पु.ल. नसतांना. पु.ल. आज पार्ल्याचाच काय पण या जगाचाच निरोप घेऊन गेल्यानंतर आज त्र्यंबक सदन कसं असेल?.... अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा योग यावा, पण प्रत्यक्ष परमेश्वरानी त्याआधीच तिथून आपला मुक्काम कायमचा हलवावा, अशा वेळी भक्ताची जी अवस्था होईल ती अनुभवत मी आणि मनोज गेट जवळ पोहोचलो.

मनोज मूळचा पार्लेकरच. त्यामुळे पूर्वीचं त्र्यंबक सदन, त्यासमोरचा रस्ता, रोज संध्याकाळी तिथल्या बाकावर पु.लं.चे भाऊ उमाकांतकाका बसत ती जागा आणि ते हुबेहुब पु.लं.सारखे दिसत असल्याने फसलेला मनोज आणि त्याचा मित्र. अशा गमती जमती त्याच्याकडून ऐकतच आम्ही जिना चढून वर गेलो.


रमाकांतकाका आमचीच वाट बघत होते. हे पु.लं.चे सर्वात धाकटे भाऊ. पु.लं.पेक्षा १० वर्षांनी लहान. तर उमाकांतकाका ३ वर्षांनी लहान. ते आम्हाला उमाकांतकाकांच्या खोलीत घेऊन गेले. ८० वर्षांचे उमाकांतकाका आता पूर्णपणे अंथरुणावरच असतात. 'भावाची साहित्यिक नाही तरी ही गादी मात्र चालवत आहे,' असं ते म्हणाले आणि आम्ही हेलावून गेलो. गेल्या ८० वर्षांच्या काळात पु.लं.ची लहानपणापासूनची जडणघडण, अनेक चांगले वाईट अनुभव, लाभलेले मानसन्मान, पु.लं.ना रसिकांचे मिळालेले उदंड प्रेम आणि हेवा करायला लावणारे पु.लं.चे समृध्द आयुष्य या दोघांनीही अगदी जवळून पाहिले असल्याने, असंख्य आठवणींचा खजिनाच त्यांच्याकडे आहे. आज या खजिन्यातील काही आठवणी प्रत्यक्ष या दोघांकडून ऐकायला मिळणार होत्या. स्वत:च्याच भाग्याचा हेवा करत त्यांचा शब्द न शब्द मी कानात साठवू लागले.

बोलता बोलता उमाकांतकाका ६०-७० वर्ष मागे गेले. आम्ही सुरुवातीला जोगेश्वरीला ज्या सोसायटीत रहायचो तिचं नाव 'सरस्वती बाग'. सुरुवातीला आम्हाला तिथे रहायला जागा मिळेना. सोसायटीतच एका पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही रहायचो. मग वर्ष- दोन वर्षानी आम्हाला रहायला जागा मिळाली. त्याकाळी जोगेश्वरीत टाकी महाराज म्हणून होते. 'पुरुषोत्तम' हे नाव त्यांनी ठेवलं. हल्लीच्या महाराजांसारखे ते बुवाबाजी वगैरे करणारे नव्हते. ते education inspector होते. Retire झाले होते आणि प्रवचन करायचे. भाईचं, माझं, रमाकांतचं नाव त्यांनीच ठेवलं. २८-३० साली आम्ही जोगेश्वरीहून पार्ल्याला आलो ते आत्तापर्यंत इथेच आहोत. भाई, मी आणि रमाकांत आमच्यापासून ते आमची तिसरी पिढी सुध्दा 'पार्ले टिळक' मध्येच शिकली. आम्ही शाळेत असतांना, जात-पात वगैरे गोष्टींबाबत लोक जागरुक असत. 'मासे कोण खातात त्यांनी हात वर करा' असंही चक्क शाळेत विचारत. मग आम्हीही आपले इमाने इतबारे हात वर करत असू. कोकणस्थ नाही तो अस्पृश्य असंच समजलं जायचं. अर्थात आम्हालाही कधी या गोष्टीचं वाईट वाटलं नाही. राग यायचा कधीकधी पण ते त्यावेळचे संस्कारच होते तसे. पण जे दोस्त होते ते मात्र सगळे ब्राह्मण. एकदा माझ्या समोरच घडलेला हा किस्सा- आमची आई शेव छान करायची. संध्याकाळी शाळा सुटली कि शेव खायला सगळे जण आमच्या घरी. एकदा भागवत आडनावाच्या एका मित्राने भाईला विचारलं,"पुरुषोत्तम, तू देशपांडे म्हणजे सारस्वत ना?" भाई म्हणाला, "हो""मग तुम्हाला काय म्हणायचे माहितीये?""काय?""तुम्हाला शेणवी म्हणत असत. कारण तुमचे पूर्वज शेण विकायचे."भाईनी ताबडतोब उत्तर दिलं. "तुमचे पूर्वज शेण खायचे म्हणून आमचे पूर्वज शेण विकायचे."

शाळकरी वयापासून अशा प्रसंगांना हसत हसत पु.ल. टोला मारत. जाती व्यवस्थेविषयी पु.लं.च्या मनात चीड म्हणूनच निर्माण झाली असावी. पुढे वयाने, कार्याने मोठे झाल्यावर पु.ल. हा राग बाहेर काढू शकत होते.पण उलट त्यांनी माणूस ही एकच जात कायम मानली आणि ते स्वत:ही कायम तसेच वागले.
लहानपणापासूनच हजरजबाबी असलेल्या पु.लं.चा आणखी एक किस्सा सांगताना रमाकांतकाका म्हणाले, नागपूरच्या एका सभेमध्ये सुरुवातीला अत्रे बोलले. नेहमीप्रमाणे हशा, टाळ्या सगळी सभा अत्र्यांनी जिंकली. मग भाई उभा राहिला. आता हा काय बोलणार असा सगळ्यांना प्रश्न पडला. पण सुरुवातीलाच अत्र्यांची ओळख करुन देताना भाई म्हणाला,'नरसिंहासारखी बलदंड शरीरयष्टी असलेल्या या माणसाचे नाव प्रल्हाद!' आणि या एका वाक्याने भाईने सभा फिरवली. तसंच एकदा वहिनीनी काहितरी काम सांगितलं. दोन-तीनदा सांगूनही ते काम झालं नाही. तेव्हा वहिनी म्हणाली," हे बरं आहे, तुम्हा पुरुषांची सगळी कामं बायकांनी केली पाहिजेत. पण बायकांचं काम मात्र तुम्ही पुरुष कधीच करत नाहीत." भाई म्हणाला," असं बोलू नको, बालगंधर्वांनी आयुष्यभर बायकांचीच कामं केली."

वहिनीला सुध्दा तो गमतीनी 'उपदेशपांडे' म्हणायचा. शिस्त, नियम या बाबतीत ती फारच कडक होती, पण तिला तसं रहावंच लागलं. जिद्द, मेहनत, धडाडी अशा गुणांमुळे संपूर्ण देशपांडे कुटुंबाला सुनीताबाईंनीच सावरलं, सांभाळलं. त्यांच्याविषयीचा आदर उमाकांतकाका आणि रमाकांतकाकांच्या शब्दा शब्दात जाणवत होता." तुम्हाला सांगतो, ती जर व्यवस्थित नसती ना तर भाईला लोकांनी हैराण केलं असतं हे मात्र नक्की. त्याचं काय होतं काहीही झालं की जाऊ दे ना, असू दे ना, पण वहिनी मात्र अगदी Particular होती. 'वाऱ्यावरची वरात' मध्ये सुरुवातीचे प्रसंग हे अनुभवातूनच लिहीलेले आहेत. कुठेही भाषणाचं वगैरे बोलावणं असेल आणि भाईला वेळ नसला तर हे लोक 'ते येणार होते पण येणार नाहीत म्हणून कळ्वलं आहे' असं सांगून मोकळे. म्हणजे दोष भाईलाच. असे प्रसंग घडल्यावर वहिनीनी मग कुठलेही कार्यक्रम, सगळं ठरवणं वगैरे ताब्यात घेतलं. आणि ती ते व्यवस्थित सांभाळायची. कारण कोणाला दुखवायचं वगैरे भाईला जमत नसे. पण वहिनी सुरुवातीला सेवादलात असल्यामुळे एक प्रकारची शिस्त, व्यवस्थितपणा तिच्यात होता."

पु.लं.च्या यशामागे सुनीताबाईंचा असलेला वाटा, त्यांची जिद्द याविषयी उमाकांतकाका आणि रमाकांतकाका भरभरुन बोलत होते. पु.ल. आणि सुनीताबाईंनी दिलेल्या देणग्यांचा विषय निघाला. "देणग्या तर भाईनी लाखो रुपयांच्या दिल्या. पण एकदाही घरात काही सांगितलं नाही. आम्ही पेपरात वाचायचो, तेव्हा आम्हाला समजायचं. तो लोकांना म्हणायचा, तुम्ही मला दाता वगैरे म्हणू नका. मी दाता वगैरे कोणी नाही. जिथे मला असं वाटतं खड्डा आहे तिथे तो बुजवता आला तर शक्य तेवढं मी करु शकतो. दाता वगैरे म्हटलं तर ते घेणारा कोणीतरी कमी आहे असं वाटतं. म्हणून तो म्हणायचा मी दाता वगैरे नाही."
मी एकदा बंगलोरला गेलो होतो. एका तलावाजवळ आम्ही होडीने फिरण्यासाठी म्हणून गेलो. एक बाई धावत आली. म्हणाली, 'तुम्ही देशपांडे का?' मी म्हटलं, 'हो'. 'पु.लं.चे भाऊ का?' 'हो. का?' तर म्हणाली,'मी परवाच पु.लं.कडे गेले होते. चेक आणायला.' असं म्हटल्यावर मला आश्चर्य वाटलं. भाईकडे चेक मागायला कोण गेलं असेल? मी म्हटलं, 'असं का. का बरं?' तेव्हा समजलं, सोलापूर जवळ कुठेतरी एक Open University होती. तेथे भाईनी देणगी दिली होती. मी विचारलं,'किती?' तर ती म्हणाली,'बारा लाख!' हे मला त्या दिवशी त्या बाईकडून समजलं. पण भाईनी किंवा वहिनीनी आम्ही कोणाला इतके पैसे दिले, हे कधी आयुष्यात आम्हाला सुध्दा सांगितलं नाही.

होतकरु वयात भाईनी सहन केलेले अपमान मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. आमचे वडील अचानक गेले. तेव्हा भाई १९ वर्षाचा होता. मी १७ वर्षाचा तर रमाकांत १०-११ वर्षाचा. भाई तेव्हापासूनच शिकवण्या करायला लागला. भावगीतं गायचा. शाळेत असल्यापासूनच चाली लावायचं त्याला वेड होतं. 'माझिया माहेरा जा' ची चाल त्यांनी तो कॉलेजमध्ये असतानाच बसवली होती. नंतर मग ती ज्योत्स्नाबाईंनी गायली. राजा बढे आमच्या घरी यायचे. तेव्हा त्यांनी लिहिलेली ती कविता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना ती चाल भाईनी बसवली. आम्ही तेव्हा पैशासाठी म्हणून १५ रुपयाला कार्यक्रम करायचो. तशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते. भाई पेटी वाचवून गायचा. मी तबल्यावर आणि मधू गोळवलकर सारंगीवर. १५ रुपये मिळायचे. ५-५ रुपये आम्ही वाटून घ्यायचो. त्या काळात अशा परिस्थितीतून आम्ही गेलो होतो. असं होतच असतं प्रत्येकाच्या आयुष्यात. रिक्षाने जायला पैसे नसायचे, म्हणून मग चालत जावं लागे. याचा परिणाम म्हणून असेल भाईकडे दातृत्व आलं. अनेकांना ही गोष्ट माहित नाही, त्यांनी अनेक साहित्यिकांना पुष्कळदा मदत केली आहे. पण परत मागणं वगैरे काही नाही. आणि वहिनीचा Support हा भाईला कायम होता. एक प्रसंग मला आठवतो, एक साहित्यिक नवीनच मुंबईला आला. त्याचं नाव नाही सांगत, पुढे तो खुपच मोठा झाला. पण सुरुवातीला त्याला रहायला जागा नव्हती. एक खोली मिळत होती, पण ९०० रुपये हवे होते. आणि त्याच्याकडे पैसेच नव्हते. त्यावेळेला भाईचं 'बटाट्याची चाळ' फार जोरात चाललं होतं. आणि त्या बुकिंगवर मी असायचो. भाई तेव्हा सांताक्रूझला रहायचा. त्या दिवशी जमलेली कॅश घेऊन मी भाईकडे गेलो होतो आणि त्याच वेळेला तो लेखक आला होता. तो म्हणत होता, वसईला अशी - अशी जागा मिळतेय, पण ९०० रुपये मागतायेत. भाई जरा विचारात पडला. ५ मिनिटांत वहिनी बाहेर आली आणि ९०० रुपये त्याच्या हातावर ठेवले. आमचं जे Collection होतं त्यातले ते ९०० रुपये होते. पण तरी तू परत कधी करणार असं विचारलं सुध्दा नाही. याचं कारण मला असं वाटतं, लहानपणी जे भोगावं लागतं, त्याची दोन reactions होतात. माणूस एक तर फार सूडबुद्धीने तरी वागतो, किंवा अत्यंत प्रेमळ तरी बनतो. सुदैवाने सूडबुद्धी भाईकडे नव्हतीच.

यासंदर्भात आणखी एक उदाहरण सांगतो. नाव नाही सांगत त्या व्यक्तिचं. कारण ती सुद्धा मोठी लोकं आहेत. भाई All India Radio वर होता. Program Executive म्हणून. नंतर त्याची लंडनला बी. बी. सी. वर टेलिव्हिजनच्या शिक्षणासाठी निवड करण्यात आली. जायच्या आधी त्याला सांगितलं गेलं, तुझ्या जागेवर योग्य व्यक्तिची तू निवड करुन ठेव. हे कळल्यावर रेडिओवर applications यायला लागली. एकेकाळी भाई ज्या नाटक कंपनीत होता, त्या नाटक कंपनीचा बोजवारा उडाल्यामुळे तिचा मालक कामाच्या शोधात होता. त्यानीही application दिलं. इतरही ओळखीच्या लोकांनी application केलं होतं. पण भाईनी त्यांना सांगितलं, की तुम्ही सगळे आधीपासून नोकरीवर आहात. त्याला खरी गरज आहे. आणि त्याची निवड भाईनी केली. पण याच माणसाकडे जेव्हा भाई नोकरीला होता आणि एम.ए. करायचं म्हणून भाईनी नोकरी सोडायची ठरवली, तेव्हा तो मालक म्हणाला होता, परत माझ्या दारात आलास तर तुला नोकरी देणार नाही. आणि आज तोच माणूस भाईकडे आला होता. पण भाई त्याच्याशी सूडबुद्धीनी वागला नाही.
भाईची नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पार्ल्यात भाईचा मोठा सत्कार झाला होता. अनेक मोठी माणसं त्यावेळी उपस्थित होती. अतिशय ह्रदयस्पर्शी असा तो कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपल्यानंतर भाईभोवती लोकांची गर्दी जमली. भाईला प्रत्येकजण हार वगैरे घालत होते. तेवढ्यात गर्दीतून माझा एक मित्र एका व्यक्तिला हाताला धरून घेऊन येत होता. बघतो तर भाईचे शाळेतले तारपुंडे मास्तर होते! भाईला ज्यांनी नाटक शिकवलं. ते गिरगावात रहायचे. गर्दीमुळे त्यांना आत यायला मिळत नव्हतं. आमचा एक मित्र त्यांना हाताला धरुन स्टेजवर घेऊन आला. त्यांनी भाईच्या गळ्यात हार घातला. भाईनी साष्टांग नमस्कार घातला त्यांना. लोक आश्चर्याने बघायला लागले. ते आमचे शाळेतले शिक्षक होते. सायन्स शिकवायचे. पण नाटक, sports activities या गोष्टींना त्यांचे सतत प्रोत्साहन असे."

पु.लं.च्या पेटीविषयी ऐकण्याची माझी खूपच उत्सुकता होती. "भास्कर संगीत विद्यालयात राजोपाध्ये म्हणून मास्तर होते, त्यांच्याकडे आम्ही शिकायला जायचो. आमच्याकडे एक असा नियमच होता, वडील संध्याकाळी ऑफिसमधून आले, की ७ ते ८ भाई पेटी वाजवायचा आणि मी तबल्यावर साथ करायला. पण एक तास पेटीचा रियाझ झाल्याशिवाय आम्ही जेवायला बसत नसू. आमची आईसुद्धा ऐकायला बसत असे. वडील बसत असत. आई चांगली गायची सुद्धा. पेटीची आणि सूरांची ओढ भाईला लहानपणीच लागली. पेटीतर त्यानी ऐकूनच वाढवली. दरवर्षी त्या क्लासचा समारंभा व्हायचा. त्यात कार्यक्रम व्हायचे. एका कर्यक्रमाला बालगंधर्व आले होते. भाई तेव्हा पेटी वाजवायला बसला. त्यांनी कुठलं तरी नाट्यगीत वाजवलं होतं. गंधर्व खुर्चीवरुन उठले आणि भाईच्या समोर येऊन बसले. त्यांनी ते इतकं मन लावून ऐकलं, आणि संपल्यावर भाईच्या पाठीवर शाबासकी दिली! ती पेटी त्यानी पुढे आयुष्यभर सुरु ठेवली. जपली, वाढवली."२२ रु. ला घेतलेली पेटी, आणि ३ रु. ला घेतलेल्या तबल्याची आठवण उमाकांत काकांना अजून आहे. तो तबला त्यांनी अजूनही आठवण म्हणून जपून ठेवला आहे.

"गाणी ऐकायला आणि नाटकं बघायला वडीलांनी कधीही अटकाव केला नाही. रमाकांत अगदी लहान होता. भाईला आणि मला घेऊन वडील शनीवारी ऑपेरा हाऊसला जायचे. रात्रीचं नाटक असे. बालगंधर्व, मा. कृष्णराव सगळ्यांना स्टेजवर आम्ही शाळकरी वयात होतो, तेव्हा पाहिलं आहे. रात्री पार्ल्याला परत यायला गाड्या नसायच्या. १-१:३० वाजता नाटक संपलं, की मराठा हायस्कूल मध्ये बाक ओढून मी, भाई आणि वडील आम्ही तिघेही झोपायचो आणि सकाळी पहिली गाडी पकडून परत यायचो. पण वडीलांनी कधीही मनाई केली नाही. गणेशोत्सवातल्या सगळ्या गाण्यांना आम्ही न चुकता जात होतो. या सगळ्यासाठी वडीलांकडून, आईकडून खूप प्रोत्साहन मिळालं आणि त्याचा भाईनी खूप चांगला उपयोग करुन घेतला.भाईकडे लेखन आलं, ते आजोबांकडून. आमचे आजोबा- ऋग्वेदी, यांनी त्या काळात बरंच लिखाण केलं होतं. 'आर्यांच्या सणांचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास' असं त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. आपले सगळे सण, त्यांची माहिती, त्यांचं महत्त्व असं बरंच अभ्यासपूर्ण आणि वेगळं पुस्तक होतं ते. टागोरांची गीतांजली त्यांनी संपूर्ण अभंगात रचली होती. त्यांचं शिक्षण कानडीत झालं होतं, पण मराठी लेखन करायचे ते. शिवाय गीतांजली वाचण्यासाठी म्हणून बंगाली सुद्धा शिकले. मग ती संपूर्ण अभंगात रचली आणि ते पुस्तक टागोरांना नेऊन दाखवलं. त्यामुळे लेखनासाठीचं प्रोत्साहन भाईला आजोबांकडून मिळालं.
भाषणाच्या बाबतीत सुद्धा वडील सांगत तुझं भाषण तूच लिहून काढलं पाहिजेस. वडीलांच्यामुळेच शाळकरी वयात भाईंच्या वकतॄत्व कलेला प्रोत्साहन मिळालं. मला शाळेत असतानाच त्यानी किर्तन सुद्धा लिहून दिलं होतं. अगदी पूर्वरंग, उत्तररंगासकट! 'बेबंदशाही' हे नाटक भाईनी स्त्री पात्र वर्ज्य करुन लिहिलं. आम्ही ते शाळेत असतांना सादर सुद्धा केलं होतं. भाई स्वत: संभाजी झाला होता. आम्हाला मावळे केलं होतं. (कारण मावळ्यांना भाषण नव्हतं.)

हे करु नको, ते करु नको, असं आम्हाला घरुन कधीही सांगितलं गेलं नाही. अभ्यासातही लक्ष असायचं, तसंच ह्या activities मध्येही. आईवडीलांचा यात खूप मोठा हात आहे.भाईच्या उत्स्फूर्तपणा, वक्तृत्व या गुणांना यामुळे लहानपणीच प्रोत्साहन मिळालं. कुठेही काही कार्यक्रम झाले, खाडिलकरांनी पोवाडे म्हटले, की दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पोवाडा. पुढे जे एकपात्री त्यानी केलं, ते तो लहानपणापासूनच करत होता."

एकपात्री वरून सहाजिकच 'बटाट्याच्या चाळी'चा विषय निघाला. उमाकांतकाका म्हणतात,'चाळीवर' ते एक पुस्तक लिहू शकतील एवढ्या आठवणी आहेत त्यांच्याकडे. अत्रे, नाथ पै, मामा वरेरकर अशा दिग्गज मंडळींनी 'चाळीच्या' प्रयोगाला दिलेल्या भेटीच्या आठवणी ते सांगत होते.मामा वरेरकर दिल्लीहून खास प्रयोग बघण्यासाठी म्हणून आले होते. interval ला काही हवं का म्हणून विचारलं, तर म्हणाले, नको. तो दमला असेल. मी बसतो इथेच. आणि खुर्चीत बसून राहिले. मी भाईला जाऊन सांगितलं. त्यांना तुला भेटायचं आहे, पण म्हणाले तू दमला असशील. जरा वेळाने भेटतो. भाई म्हणाला, नाही नाही. मी येतो आत्ताच. भाई आला. तोपर्यंत लोक निघून गेले होते. मामा वरेरकर खुर्चीतच बसून होते. भाई आल्याबरोबर ये, बस म्हणाले. आपल्या शेजारी बसवलं आणि पाठीवरुन हात फिरवत म्हणाले, 'बाळा दमला असशील रे.' इतकं त्यांचं प्रेम होतं भाईवर. भाईनी रेडिओवरची नोकरी सोडल्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटलं असेल ते मामा वरेरकरांना. मला न सांगता तू नोकरी कशी सोडलीस म्हणून त्यांना रागही आला होता. इतके प्रेमळ होते ते.

एकदा अत्रे 'चाळीच्या' प्रयोगाला आले होते, पण न भेटताच निघून गेले. भाईला वाटलं त्यांना प्रयोग आवडला नसेल. प्रयोग संपल्यावर रात्री आम्ही सगळे भाईच्या घरी जायचो. तिथे जेवून वगैरे गप्पा मारत बसलो होतो. १-१:३० वाजता फोन वाजला. भाईनी फोन उचलला. कानाला लावला. आम्ही सगळे बघत होतो. 'मी बाबुराव अत्रे बोलतोय. आत्ताच तुझ्यावर अग्रलेख लिहून संपवला आहे. आता मी मरायला मोकळा.' आणि खरोखरीच त्यांनी दुसऱ्या दिवशी मराठा मध्ये 'चाळी'वर चार कॉलमचा अग्रलेख लिहिला! तो अजूनही 'टिळक मंदिरात' ठेवला आहे.

'बटाट्याची चाळ' नंतर, 'पु.ल.देशपांडे सहकुटुंब सहपरिवार'.. 'वराती'च्या प्रयोगाबद्दल ऐकायला साहजिकच आम्ही उत्सुक होतो.रमाकांतकाका सांगायला लागले, "आम्ही सगळे नातलग, मित्र मिळूनच 'वाऱ्यावरची वरात' करायचो. भाई, वहिनी, मी, काही दिवस उमाकांत, माझा एक भाचा, एक बहीण आणि आमची इतर सगळी मित्र-मंडळी सुद्धा अगदी घरच्यासारखीच. आमची अशी नाटक कंपनी वगैरे नव्हती. सगळे घरचेच. त्यामुळे वातावरण सुद्धा खेळीमेळीचं असायचं. आणि प्रयोग सुद्ध कसे, तर दररोज व्हायचे. 'असा मी असामी' चा प्रयोग सुद्धा भाईनी १५ दिवस सलग केला आहे. 'वराती'च्या वेळेला प्रत्येकाची नोकरी धंदा यामुळे आम्ही शनिवार, रविवार सलग पाच प्रयोग सुद्धा केले आहेत. शनिवारी २ प्रयोग आणि रविवारी ३ प्रयोग.

तेव्हा आम्ही सगळे खूप काही actor वगैरे नव्हतो. पण एकत्र मिळून करायचो. आता लालजी देसाई, त्याला स्टेजवर जाऊन एक वाक्य बोलता येत नाही. स्टेजवर गा म्हटलं तर गाईल, पण नाटकात काम कर म्हटलं तर शक्य नाही. भाईनी सांगितलं, मी तुला असं काम देतो, की त्यात फक्त तुला गायला लागेल. वाक्य दोन-चारच असतील. आणि मग त्याला 'देसाई मास्तर'चं काम दिलं ती ४-५ च वाक्य होती काहितरी. पण ती सुद्धा तो बिचार पाठबिठ करुन म्हणत असे. श्रीकांत मोघे, दत्ता भट, शशी झावबा हे सगळे मित्रच होते त्याच आमचे.

आमचा एक भाचाही होता. त्याल नुसतं येऊन बसायचंच काम होतं. कोणीतरी गावातला वगैरे माणूस म्हणून. बोलायचं काही नव्हतं. मग तो आपला येऊन नुसता बसायचा. म्हणजे अशी सगळी घरचीच मंडळी होती. लालजी देसाईला तसं फक्त गायचंच काम होतं. आणि ४-५ वाक्य. पण एकदा त्याला यायला उशीर होणार होता, म्हणून भाईनी त्याला मुंबईहून पुण्याला विमानानी नेला. भाईची प्रत्येकालाच अशी घरच्यासारखी treatment होती. त्यामुळे ते ही सगळे फार खूष असायचे. आणखी एक जण म्हणजे मधू गानू. जो भाईचा आयुष्यभर सेक्रेटरी म्हणून राहिला. आणि अजूनही वहिनीला मदत करतो. पुरुषोत्तम मंत्रीसारखा ऑफिसरसुद्धा धोब्याचं काम करायचा वरातीत. नीला देसाई (नीलम प्रभू), विजया मेहता असे आम्ही सगळे जण एकाच कुटुंबातले असल्यासारखे होतो."

पु. लं.ना मिळालेली लोकप्रियता, रसिकांचे उदंड प्रेम याचेही अनेक किस्से या दोघांकडे आहेत. उमाकांत काका अगदी भाईंसारखे दिसत असल्यामुळे फसलेलेही बरेच लोक आहेत. त्यांनी एक किस्सा सांगितला. "आम्ही म्हैसूरला फिरायला गेलो होतो. एक ठिकाणी तलावाजवळ उभे होतो. तिथेच मला वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर भेटले. आम्ही तिघेही बोलत होतो. तेवढ्यात एक फोटोग्राफर धावत आला आणि दोघांना म्हणाला, "तुम्ही दोघे बाजूला व्हा. मला पु.लं.चा फोटो घ्यायचा आहे." वसंत बापटांनी डोक्याला हात लावून सांगितले, हा पु.लं.चा भाऊ आहे. मी वसंत बापट आणि हे पाडगावकर आहेत.

तसंच एकदा पार्ल्यात रस्त्यावरुन फिरत असतांना पु.लं.चे भाऊ म्हणून मला एका साऊथ इंडियन माणसाने अक्षरश: साष्टांग नमस्कार घातला होता."उमाकांत आणि रमाकांत काका आठवणींची एकेक लड उघडत होते. आम्ही ज्या खोलीत बसलो होतो, त्या खिडकीबाहेरुन निरनिराळ्या पक्ष्यांचे गोड आवाज पार्श्वसंगीताचं काम करत होते. आणि त्या काळचं ते घर, वातावरण याची कल्पना येत होती. त्या खिडकीबाहेरची ती झाडं, आम्हीसुद्धा या सगळ्याचे साक्षीदार आहोत बरं का! असंच जणू सांगत होती.
शब्दांशी लीलया खेळणारा, सुरांच्या हातात हात घालून चालणारा, जीवनातला प्रत्येक क्षण अक्षरश: जगलेला आणि मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत बनलेला तो जादूगार... त्याच्या आठवणी एका तासात थोडीच संपणार होत्या? पण त्यातल्या ज्या काही आमच्या वाट्याला आल्या, त्या मात्र आमची 'पुलकित' संध्याकाळ सोनेरी करुन गेल्या.

- स्मिता मनोहर.


मदिना'निमित्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख. प्रवीण टोकेकर
अर्थात दस्तूरखुद्द 'ब्रिटिश नंदीं'नी लिहिलेला. पु.लं. - सुनीताबाईंचं नातं
इतक्या हळुवारपणे सांगणाऱ्या त्यांच्या शब्दांना कुर्निसात!................
................उन्हाचा झळझळीत पट्टा इथं आतपर्य़त येतो. खूप वॆळ त्याच्याकडे बघितलं,की डोळे दुखतात थोडेसे चालायचंच. समोर रस्त्यावरच्या वर्दळीकडे भाईकाका टकटक बघत राहिले. रोज सकाळी अंघोळ किंवा स्पंजीग आटोपलं, की कुणीतरी त्यांना इथं आणून बसवतं. कुणीतरी म्हणजे बहुधा माईच. या खिडकीशी बसायचं आणि चिटकुला ब्रेकफास्ट करायचा. कितीही बेचव असला, तरी भाईकाका तो ऎन्जाय करायचे. हळूहळू त्यात पाखरांची किलबिल ऎकायची. द्र्ष्टीशेपात येणारा झाड्झाडोरा आनंदी वृत्तीन न्याहाळायचा. एखादी झकासशी टेप लावून देऊन माई आपल्या कामात बुडून जायच्या. भाईकाकांचे खरपुड्लेले पाय तबल्याच्या ठेक्यानिशी किंचित हलत, तेव्हा खुप सुंदर वाटतं .......


गेली काही वर्ष तरी हेच रुटिन आहे. औषधाच्या गोळ्या आणि न बाधणारा माफक आहार. पुन्हा औषधाच्या गोळ्या ठरलेल्या वेळी झोपलंच पाहिजे हि माईची शिस्त. कधी कधी भाईकाका गमतीनं म्हणत, 'अर्धशिशीला माई ग्रेन' का म्हणतात, कळलं का तुला!बाहेरची वर्दळ बघत बसण्याचा कंटाळा आला, की भाईकाकाचं काहीही दुसऱ्याला करायला लागता कामा नये, असा त्यांचा हट्ट असे. हा हट्टच रोज भल्या पहाटे त्यांना उठवी. रात्री अंथरुणाला पाठ टेकेर्यतं त्यांच्या मनात भाईकाकांच हवं-नको बघणं याच्याशिवाय दुसरं काही नसे. भाईकाकासुध्दा त्यातलेच. 'माई किती करतात!' आम्ही आहोत ना!' असं सांगणाऱ्या आसपासच्या मंडळीसमोर भाईकाका फक्त हसायचे. काही म्हणता काही बोलायचे नाहीत. जणू आपलं सगळं फक्त माईंनीच करावं, अशी त्याचीचं अपेक्षा असायची.....
'रवी मी.... दीनानाथाच्या सुरांची लड चमकून गेली आणि भाईकाका खुशालले. खुर्चीच्या हातावर बोटांनी त्यांनी हलकेच ठेका धरला. जांभळया-लाल रंगाच्या एखादा फलकारा वेडीवाकडी वळणं घेत जावा, तशी नाटकाची घंटा त्यांच्या मनात घुमली. धुपाचा गंध दरवळलला. उघडलला जाण्यापूर्वी मखमली होणारी अस्वस्थ थरथर त्यांना स्पष्टपणे जाणवली आणी त्यांनी खुर्चीच्या पाठीवर हलकेच मान टेकून डोळे
मिटले.

पाहिल्यापासून माई तशी भलतीच टणक किंबहुना तिचा हा कणखरपणा पाहूनच आपण तिच्याकडे ओढले गेलो. गॊरी गोरी पान, बारकुडी अंगकाठी, साधीसुधीच सुती साडी; पण त्या नेसण्यातही किती नेटनेटकेपण. या मुलीच्या अंगावर एकही दागिना नाही, हे सुद्धा कुणाच्या लक्षात आलं नाही कधी....कुठल्या तरी संस्थेच्या वर्धापनासाठी ही आपल्याला घ्यायला आली होती. टांग्यात मागं आपण आणि मधू
मांडीवर तबला नि डग्गा घेऊन बसलेले. सुपात पेटी! टांग्येवाल्याच्या शेजारी ही बारकीशी पोर. घोड्याच्या पाठीवर वाटेल तसा चाबूक ओढणाऱ्या टांगेवाल्याला तिनं कसला झापला होता. 'चलना हे तो ठीक सें चलाव! नाही तर मी चालवते!!'टांग्यातून उतरल्यावर हिनं त्याला पैसे विचारले. "द्या आणा-दीड आणा,"
तो म्हणाला."आणा की दीड आणा?"मधूच्या बरोबरीनं आपण कित्येक दिवस या मुलीची नक्कल करत असू. पुढं आशाच काही सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वारंवार भेटी होऊ लागल्या. ती आली, की मधू ढोसकण्या द्यायच्या. आपण बोअर झाल्याचा आव आणायचो. अशा माईशी मी लग्न करणारे, हे कळल्यावर मधू हैराण झाला होता. म्हणायचा, 'अरे लेका, तू गाण्याबजावण्यातला माणूस. तुझं काय जमणार या इस्त्रीवालीशी?

पण, माई इस्रीवाली नव्हतीच. कॉलेजची सहल होती तेव्हा हे कळलं सिंहगडावर सगळे पोचल्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी कोंडाळं करून बसले. मी पाहुणा आघाडीचा आणी तरीही स्वस्तात पटलेला भावगीत गायक! पोरीबाळीसमोर भाव खात पाच-सहा पदं म्हटली. हाताच्या तळव्यावर हनुवटी रेलून शांतपणे ही ऎकत होती. मग मैत्रिणींनी आग्रह केल्यावर तिनं कविता म्हटली. कुठली बरं?आठवलं! माधव जूलियनांची-
कोठे तरी जाऊन शीघ्र विमानी
अनात ठिकाणी...
स्वातंत्र्य जिथे, शांती जिथे,
प्रेम इमानी
तेथे चल राणी!
भाळ न इथे प्रिती धनाविण कुणाला,
ना मोल गुणाला,
लावण्य नसे जेथे जणू चीज किराणी
तेथे चल राणी!....
पेटीवर सूर धरता धरता स्पष्टपणे जाणवलं. आपण आता, या क्षणी, इथं सिंहगडावर, प्रेमात पडत आहोत.... इस्त्रीवाली पाणी खूप खोल होतं.हिच्या व्यक्तिमत्त्वातलं तो करडेपणा, खरखरीतपणा, खोटा आव आहे काय? सोर्ट ओफ डिफेन्स मेकनिझम? तिच्या ठायी खरोखर हे इतकं मार्दव आहे? वस्तुतः जूलियनांची ही कविता आपल्याला अजिबात आवडायची नाही. उगीच आपलं 'ट' ला 'ट' आणि 'राणी' ला 'पाणी'! पण माईनं ती कविता अक्षरशः उलगडून दाखवली. नुसतीच कविता नव्हे रीतीभाती पल्याडच्या तो चांद्रप्रदेशही दाखवला....

चार-आठ दिवस गेल्यावर एक पत्र लिहिलं आणि माईला आपल्या भावना कळवून टाकल्या. आता 'हो' म्हण. मी मोकळा झालो आहे.उलट टपाली पाकीट आलं. फोडलं तर आत आपणच पाठवलेलं पत्र.... साभार! त्याच कागदाच्या पाठीमागं मात्र दोनच शब्द होते : 'अर्थात होय!".
पुढं माईनं सगळाच ताबा घेतला. लग्नाची तारीख तिनंच ठरवली. नोंदणी पद्धतीनंच करायचं, हा देखील निर्णय तिचाच. घर मांडायची वेळ आली तेव्हा, तिनं आपल्याशी फारशी चर्चासूघ्दा केली नाही. आपण गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये, रेकार्डिंगमध्ये बूडालेलो आणी ही बाई भाड्याच्या घरं शोधतेय पागडीसाठी हुज्जत घालतेय. अर्थात, आपल्याला बहुधा हे जमलंही नसतं. पुढंही कधी काही करायची वेळ आली नाही,
माईनं ती येऊ दिली नाही.
मित्रमंडळ मोठं होतं कामही खूप होती टाईम मेनेजमेंटच्या बाबतीत आपला मामला तसा यथातथाच. माईनं हे सगळं मोडून काढलं पार्ट्या-पत्त्यांचे अड्डे बंद झाले नाहीत, कमी मात्र झाले. आयुष्याबद्दलच्या तिच्या कल्पना खूप वेगळ्या होत्या. स्थैर्य माणसाची वाढ रोखतं, अस ती अधुनमधुन ऎकवायची भरपूर काम मिळत होती पैसा हाती खेळू लागला होत; पण माईच्या अंगावर दागिना काही कधी चढला नाही. लोकप्रियतेचा उन्माद कधी तिनं चढू दिला नाही. माईनं आपले हातपाय सतत हलते ठेवले. धाव धाव धावायचं, विश्रांतीला थोडं थांबायचं पुन्हा पळायला सुरवात करायची माईंमुळे हे सगळ सहज वाटत होत आपण धावतोय, हे तरी कुठं कळत होतं?
ऎके दिवशी तिनं सहज विचारल्यासारखं विचारल्यासारखं विचारलं, " अजून किती दिवस नाटकं करणार आहेस रे?""म्हंजे, समजलो नाही!""नाही, बरेच दिवस रमलायस म्हणून विचारते!" त्या दिवशी संघ्याकाळी 'ललितरंग' च्या जांभेकराना आपण सांगून टाकलं 'पुढचा महिना प्रयोग करीन. एक तारखेपासून नाटकं बंद!' त्या दिवसापासून ग्रीजपेण्ट गालाला लावला नाही. आयुष्यही तसं उतरणीला लागलं होतं.
सत्कार-समारंभाचाही कंटाळा येऊ लागला होता. वक्तृत्व कितीही चांगलं असलं, तरी भाषणं देणार किती?

आणि आता ही स्थिती. अशा विकलांग अवस्थेत एखाद्या म्हताऱ्याला वीट आला असता.असह्य अवस्थेत खितपत राहण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटलं असतं; पण माईनं यातलं काही काही जाणवू दिलं नाही. लग्न ठरल्यापासूनच ती अशी वागत नाही का?
माई हे माझ्याच व्यक्तिमत्त्वाचं एक्स्टेन्शन आहे, असं मला वाटलं. अर्थातच तिला हे वाक्य आवडणार नाही बाण्याची आहे; पण खरं सागांयच, तर तो स्वतंत्र बाणा माझाच आहे. माझंच ते तुलनेनं धड असलेलं शरीर आहे. समोर लगबगीनं मीच चालतो आहे. त्या शरीरात स्वतंत्र आत्मा आहे आणि त्याचं नाव माई आहे,
इतकंच! माई माझा स्वाभिमान आहे. आख्खं आयुष्य ती माझा 'इगो' म्हणूनच वावरली आहे.
इथं समर्पण हा शब्द समर्पक ठरणार नाही. एकमेकांचा 'इगो' होणं, येस, धिस इज दी राइट स्टेटमेण्ट!
माई माझा इगो आहे आणि तिचा मी......
"उठतोस का रे..... बरं वाटतंय ना!"
"अं?"
"अरे ती मुलं आलीत-बच्चूच्या क्लबातली. तुला 'विश' करायचं म्हणतात."
"आफकोर्स.....आफकोर्स," भाईकाका हळूहळू सावरून बसले.
आम्ही गुपचुप त्याच्यांसमोर गेलो. त्यांच्या हाती टवटवीत गुलाबांचा
गुच्छ दिला.
"भाईकाका, आज व्हेलेंटाइन डे आहे ना, म्हणून आलोय!"
"काय आहे....... आज?"
"व्हेलेंटाइन डे!"
"ओह.....सो नाईस आफ यू. मी तुमचा व्हेलेंटाइन काय!"
"भाईकाका, तुम्ही आख्ख्या महाराष्टाचे व्हेलेंटाइन!"
मिस्कील नजरेनं भाईकाका हळूहळू म्हणाले. आम्ही टाळ्या वाजवल्या. भाईकाका दिलखुलास हसले. ते पाहून माई गर्रकन वळल्या आणि सरबत करण्यासाठी आत गेल्या.
झळझळीत उन्हाचा सोनेरी पट्टा थेट आतवर आला होता....................


पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक सुरेख लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख --


पु. लं. - अखेरचा अध्याय

'हॉस्पिटल' हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो... हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे 'दुष्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला (संबंध बिघडू नयेत म्हणून) मी हॉस्पिटलमधे गेलो होतो!

यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा 'घाट' घातला. (अलीकडे 'वळण' जरी 'सरळ'पणाकडे 'झुकत' असलं, तरी 'घाटा'चा 'कल' मात्र अजूनही अवघडपणाकडेच आहे हे यावेळी माझ्या लक्षात आलं.) हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो... पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली 'ओ दूर जानेवाले' ची रेकॉर्ड आठवली.

हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला 'मेडिकल लँग्वेज' म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच 'जवळून' जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) ... त्यानंतर काही वरिष्ठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.

अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं, बसत होतं - एवढ्यात नकळतपणे - मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जेवढं खरं आहे तेवढंच 'व्यक्ती तितके सल्ले' हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना 'एका व्यक्तीमागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती' अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) लोकांचे सल्ले मात्र चालूच होते... 'स्वस्थ पाडून राहा', 'विश्रांती घ्या' इथपासून 'पर्वती चढून-उतरून या' इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं 'सिंहगड'सुद्धा सुचवला!) 'प्राणायाम', 'योगासनं' पासून 'रेकी'पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा 'मसाज', 'मालिश' असे शब्द उच्चारले, तेव्हा मात्र डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.

हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!... मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली... अशा विचारांतच मला झोप लागली...मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! (अगदी 'बटाट्याच्या चाळी'च्या कार्यक्रमाच्या वेळेची लोकांची कुरकुरही बटाट्याच्या चाळीबद्द्ल नसून बटाट्याच्या वेफर्सची आहे हे जाणून घेतलं होतं मी!) आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत?

नव्हतं सहन होत मला हे. (आणि त्यांनाही.) मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते! की कळूनही उपयोग नव्हता?... ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले... अगदी कायमचेच...

आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकं त्यांना पुन्हा हसवतील... अगदी कायमचीच....
****