त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च
न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने
प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार परदेशी जाण्याची
सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न
जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली
व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला
माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून
अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची
हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा,
आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची
आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून
घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती.
ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहर्‍याने व धाडसाने म्हणाले,
महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय
कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते
व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाही. तेव्हा यासंबंधी
कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे.
त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.

ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली. मानव नावाचा अदभूत प्राणीही निर्माण केला. त्याला तयार करताना मात्र देवाला खूप
त्रास झाला. मानवाच्या निर्मितीनंतर हा त्रास वाढू लागला तेव्हा ईश्वराने सार्‍या देवतांना बोलाविले व विचारले,
माणसाला तयार करुन मी संकटात सापडलो आहे. मला चोवीस तास हाका ऐकून घ्याव्या लागतात.
सारखं वाटतं की, माणूस सतत माझ्या दाराजवळ उभा राहून तक्रार करत आहे. त्यामुळे मला
शांतपणे झोपही लागत नाही. मी काय करु ? कोठे लपू ? जेथे माणूस येणार नाही अशी जागा सांगा ?
या प्रश्नानंतर ईश्वराला त्या सार्‍या देवतांनी अनेक जागा सुचविल्या. पण ईश्वराला वाटले काहीही करुन
माणूस तेथे पोहचणारच. म्हणून त्याने त्या सर्व जागा नाकारल्या अखेर एक म्हातारा देव उठला !
त्याने ईश्वराला कानात काहीतरी सांगितले. ईश्वरालाही ते पटले. त्या वृद्ध देवाने सांगितले होते की,
तू माणसाच्या आत हृदयात लपून बैस. ईश्वराने तसे केले आणि तो सुखी झाला.

राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी सार्‍या शेतकर्‍यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले.
अन्नही मोफत दिले जाईल, अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की, आता सगळे खूश होऊन जातील,
आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांच्या रांगेत जाऊन
ते उभे राहिले.त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले. ते शेतकरी आपापसांत कुजबुजत होते.
आपले महाराज शूर आहेत. दानशूरसुद्धा आहेत पण त्यांना व्यवहार समजत नाही.

महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हाक दिली.
महाराज ! न्यूटन विचारात दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज !
आता न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा तो नोकर म्हणाला, महाराज !
बाहेर एक गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न विचारु इच्छितात.
खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला, पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आत आले.

न्यूटनला म्हणाले, क्षमा करा महाराज, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आलोय.
मला शहाणं व्हायचं आहे. मी काय करु ? न्यूटन म्हणाला, मित्रा, शहाणं होऊन तू काय करणार
आहेस ? या प्रश्नावर तो गृहस्थ म्हणाला, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे.
त्याचे उत्तर ऐकून न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकच महामंत्र लक्षात ठेव. मन सैरभैर होऊ देऊ
नकोस.तुला हवं ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी न चळणारं अवधान धारण करायला शिक.
माझ्या यशाचं रहस्य हेच आहे. एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही.

जगदविख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्या प्रयोगशाळेला १९१४ मध्ये आग लागली.
या आगीत त्यांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाची कागदपत्रे, यंत्रसामग्री जळून खाक झाली.
या आगीची वार्ता समजताच त्यांचा मुलगा चार्ल्स एडिसन त्यांना भेटायला,
धावत आला तेव्हा थॉमस एडिसन त्याला म्हणाले, अरे पाहत काय उभा राहिलास ?
चटकन बोलावून आण. असे दृश्य पुन्हा पाहायला मिळणार नाही.
दुसर्‍या दिवशी आपल्या आशा - आकांक्षांची आणि स्वप्नांची झालेली ती राखरांगोळी पाहताना ते म्हणाले,
सारी सामुग्री नष्ट होण्याचे खूप फायदे झाले. त्यामुळे माझ्या चुकाही जळून खाक झाल्या.
आता मी नव्या जोमाने कामाला सुरुवात करु शकेन. एका अर्थी ही परमेश्वराची कृपाच म्हणायची.

देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला देशमुखांनी भेट दिली. तेव्हा एका खोलीकडे हात करुन डॉक्टर म्हणाले,
साहेब,येथे या खोलीत विमान चालविण्याचे, ते वेगाने पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत.'
देशमुखांनी उत्सुकतेने खिडकीतून आत तर त्यांना तेथे कोणीही दिसेना.
तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले,साहेब,
ते सर्व वेडे खोलीतच आहेत.पलंगाखाली झोपून, आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत,
अशी कल्पना करुन विमान दुरुस्त करत असतील.सामान्य माणसेही असेच कल्पनांचे,
मनोरथांचे विमान पळविण्याच्या आहारी गेलो आहोत.
परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते,तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही.

ही घटना आहे लखनौमधील ! त्यावेळी महाकवी निराला अमीनाबाद पार्कच्या पुढील मोहल्यात राहात होते. एक दिवशी ते असेच चालले
होते. समोर एक टांगेवाला प्रवाशांची वाट पाहत उभा होता. निरालाजींनी त्याला नीट न्याहाळले व विचारले, परवा तूच मला हजरतगंजहून
घेऊन आला होतास ना ? तो म्हणाला, होय हुजूर ! माझ्याकडून काही चूक झाली होती का ? निरालाजी सहज म्हणाले, अजिबात नाही.
परवा माझ्याजवळ फक्त दोन आणेच होते. तूला आणखी पैसे द्यायला गेले दोन दिवस मी तुला शोधत आहे. हे पैसे ठेव तुझ्याजवळ !
पांच रुपयांची नोट पाहून तो टांगेवाला चांगलाच उखडला.

निरालाजी म्हणाले, अरे रागावू नको. मी चांगल्या भावनने हे पैसे तुला देत आहे. परवा तुझा मुलगा फाटक्या तुटक्या वस्त्रात धावत
तुझ्याकडे येऊन एक पैसा मागत होता, पण तोही तू देऊ शकत नव्हतास. ती तुझी असहाय्यता मी विसरु शकलो नाही. म्हणून हे पैसे
ठेवून घे व त्या निरागस मुलाचे मन मोडू नकोस. त्या टांगेवाल्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्याने निरालाजींची क्षमा मागितली.


अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ आला नि म्हणाला, '' स्वामीजी तासन् तास बंद खोलीत
बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही.'' त्यावर स्वामीजी म्हणाले, '' सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव.
आपल्या जवळपास राहणार्‍या दुःखी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.'' यावर त्या तरुणाने त्यांना, '' एखाद्या
रोग्यासी सेवा करताना मीज आजारी पडलो तर ?'' असा प्रश्न विचारला. विवेकानंद म्हणाले, '' तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की,
प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते. म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच
त्यातील उणिवाही शोधू नयेत.हाच मनःशांती मिळविण्याचा जवळचा मार्ग आहे.

एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला
त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत.
फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला.
त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे
राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट
पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने
त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू
आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो.