प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.

मुळ स्त्रोत - विकिपीडिया

नारायण
"नारायण, पानाचं तबक कुठे आहे ?"
"नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर ---"
"नारायण, बॅण्ड्वाले अजून नाही आले ? -- काय हे?"
"नारायण, गुलाबपाण्याची बाटली फुटली ---"
"नारूकाका चड्डीची नाडी बांद ना ऽऽ ---"
"नारूभावजी, ही नथ ठेवून द्या तुमच्याजवळ. रात्री वरातीच्या वेळी घेईन मी मागून ---"

"नाऱ्या लेका, वर चहा नाही आला अजून ---व्य़ाही पेटलाय !"
"नारबा पटकन तीन टांगे सांगा ---"
पन्नास ठिकाणाहून पन्नास तऱ्हेचे हुकूम येतात आणि लग्नाच्या मांडवात हा नारायण हे हल्ले अत्यंत शिताफीने परत करीत उभा राहतॊ.
'नारायण' हा एक सार्वजनिक नमुना आहे. हा नमुना प्रत्येक कुटुंबात असतॊ. कुठल्याही समारंभाला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला हा प्रत्येकाचा कुठून-ना-कुठून-तरी नातें लागणारा नातलग घरातं कार्य निघाले की कसा वेळेवर टपकतॊ .
---ज्या दिवशी मुलगी पाह्यला म्हणून मंडळी येतात --- मंडळी म्हणजे मुलाचे आईबाप, दूरचे काका (हे काका दूरचे असून नेमके या वेळेला इतक्या जवळचे कसे होतात हे एक न सुटलेले कौटुंबिक कोडें आहे.),


नवरा मुलगा आणि मुलाचा मित्र. ह्या मंडळीत आठनऊ वर्षाची एखादी जादा चुणचुणीत मुलगीहि असते. आणि मग तिच्या हुषारीचं मुलीकडील मंडळी बरंच कौतुकहि करतात. मुलीचा बाप मुलाच्या बापाशी बोलत असतो. नवरा मुलगा गप्पच असतो. नवऱ्यामुलाकरून चा मित्र समोरच्या बिऱ्हाडातून जरासा पडदा बाजूला करून पहाणाऱ्या चेहऱ्यावर नजर ठेऊन असतो. आंतल्या भावी विहिणी आपापल्या घराण्यांची सरळ वळणे एकमेकींवर ठसवत असतात. मुलगा अगर मुलगी सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! -- कारण 'वळण' म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ?

भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे. नवरी मुलगी नम्रतेची पराकाष्ठा करीत बसलेली असते. तिच्या कपाळावरचे धर्मबिंदु टिपण्यांत तिच्या बहिणी वा मैत्रिणी दंग असतात. आणि ती आठनऊ वर्षाची 'कल्पना', 'अर्पिता' किंवा कपर्दिका असल्या चालू फ़ेशनच्या नांवाची मुलगी कपाट उघडून त्यातल्या पुस्तकात डोके खुपसून, 'अगबाई ! वाचायची इतकी का आवड आहे ?' हे कौतुक ऎकत बसलेली असते. ती चहा नको म्हणते -- बिस्कीटाला हात लावत नाही -- लाडू 'मला नाही आवडत' म्हणते; एकूण स्वत:च बरंचसं 'कौतिक' करून घेते. ' कार्टीच्या एक ठेवून द्यावी' असा एक विचार मुलीच्या आईच्या डोक्यात येतो आणि 'भारीच लाडोबा करून ठेवलेला दिसतोय' हा विचार नवऱ्यामुलीलाही शिवून जातो.

एकूण ही सर्व मंडळी निरनिराळ्या विंचारात दंग असतां एका इसमाकडे मात्र त्यावेळी कोणाचेच विषेश लक्श जात नाही. सुरवातीला मुलाच्या बापाने 'हा आमचा नारायण' एवढीच माफक ओळख करून दिलेली असते. आणि 'नारायण' संस्था ह्याहून अधिक योग्यतेची असते असेही नाही. नारायण ही काय वस्तू आहे हे मांडव उभा राहील्याशिवाय कळू शकत नाही.हे सर्व नारायण लोक खाकी सदरा दोन खिशांचा घालतात. खाली मळकट पण काचा मारलेले धोतर नेसतात. मागल्या बाजूने मुलाण्याच्या कोंबड्या ठेवायच्या पेटाऱ्यासारखा ह्यांच्या धोतराचा सायकलच्या सीट मधे अडकून-निसटून बोंगा झालेला असतो. धोतराची कमालमर्यादा गुडघ्याखाली चारपाच बोटें गेलेली असते. डोक्याला ब्राउन टोपी असते. खाकी, ब्राउन वगैरे मळखाऊ रंग 'नारायण-लोकांना' फार आवडतात. वहाण घेताना कशी होती हें सांगणे मुष्किल असते. कारण तीचा अंगठा, वादी, पट्टा, हील, सगळे काही बदलत बदलत कायापालट होत आलेला असतो. परंतु उजव्या पायाचा आंगठा उडलेला असला म्हणजे नारायणला विषेश शोभा येते. आमचा नारायण सहसा कोट घालत नाही. एकदा स्वत:च्या लग्नात, एकदा दुसऱ्यासाठी मुलगी पहायला जाताना आणि एकदा मुन्सिपाल्टीत चिकटवून घेतलेल्या सदूभाऊंना कचेरींत भेटायला गेला त्यावेळी त्याने कोट घातलेला होता. घरोघरचे नारायण, कोट असा सणासुदीलाच घालतात. कोटाच्या कॉलरला मात्र ते न चुकता सेफ्टीपिन लावतात. ही दात कोरायला अगर वेळप्रसंगी कोणाच्या पायात काटा रूतला तर काढायला उपयोगी पडते. खाकी सदऱ्याच्या मात्र दोन्ही खिशात डायऱ्या, रेल्वेचे टाईमटेबल, प्रसंगी छोटेसे पंचांग देखील असते. मुलगी पसंत झाली, हुंडा, करणी, मानपानाचें बसल्या बैठकीला जमले की मुहुर्ताची बोलणी सुरू होतात आणि गाडे पंचांगावर अडते. आणि इथे नारायण पुढे सरसावतो.
"हे पंचांग ---" नारायण कोटाच्या खिशांतून पंचांग काढीत पुढे येतो.वा !! कृतज्ञ चेहऱ्याने वधूपीता नारायणाकडे पहातो.

इथून नारायणाची किंमत लोकांना कळायला लागते. आंतल्या बायकाही प्रसंगावधानी नारायणाचे कौतुक केल्याच्या चेहऱ्याने पाहतात. नारायणाचे कुठेच लक्ष नसते. इथून त्याची चक्रे सुरू होतात. एकदा मुहूर्त ठरला की लग्न लागून वरात निघेपर्यंत नारायणाशिवाय पान हलत नाही ! आता चारी दिशांनी त्याच्यावर जबाबदाऱ्या पडत असतात आणि नारायण त्यांना तोंड देत असतो. प्रत्येक गोष्टीत "नारायणाला घ्या हो बरोबर" असा आग्रह होत असतो."मी सांगतो तुम्हाला, शालू भड्सावळ्यांच्या दुकानाइतके स्वस्त दुसरे कुठे मिळणार नाहीत." सुमारे आठनऊ निरनिराळ्या वयाच्या (आणि आकाराच्या) बायकांसह नारायण खरेदीला निघतो. सातआठ पिशव्या त्याच्याच हातात असतात. एका बाई बरोबर कापड खरेदी करणें म्हणजे मन:शांतीची कसोटी असते; पण नारायण आठ बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्याची चढउतर अत्यंत उत्साहाने करू शकतो. त्यातून त्यांना बस मध्ये आपण क्यूच्या शेवटी राहून चढवणे-उतरवणे ही स्वतंत्र कर्तबगारी असते. पण नारायणाला त्याची पर्वा नाही. आता त्याच्या डोक्याने लग्न घेतले आहे. कचेरींत त्याचें लक्ष नाही. (तिथे क्वचितच लक्ष असतें परंतु ती उणीव हेडक्लार्कच्या घरी चक्का पुरवणें, मटार वाहून नेणे इत्यादी कामांनी भरून निघते.) एखाद्याच्या अंगात खून चढतो तसे नारायणाच्या अंगांत लग्न चढतें."काकू तुम्ही माझ ऎका, महेश्वरी लुगड्यांचा स्टॉक द्रौपदी वस्त्रभांडारात आहे. इथे फक्त तुम्ही खण निवडा." मालकाच्या तोंडासमोर ही वाक्ये बोलायचे त्याला धैर्य आहे. बोहोरी आळीपासून लोणार आळीपर्यंत पुण्यात कोठे काय मिळते याची नारायण ही खाकी शर्ट, धोतर, ब्राउन टोपी घातलेली चालती बोलती जंत्री आहे."बरं बाबा ---" काकू शरणचिठ्ठी देतात."
मामी ----- काकूंना खण पाहू दे, तोंपर्यंत नरहरशेटच्या दुकानात जाऊन मंगळसूत्राचे नमुने बघून येऊ---""हो आंगठीच ही माप आणलय जावईबुवांच्या ---"
"आंगठी नरहरशेटकडे नको, रामलाल लखनमलकडे आंगठी टाकूं. मी काल बोललोय त्याला. आज माप टाकलं की पुढल्या सोमवारी आंगठी --- सोनं पुढल्या तीन दिवसांत वाढतंय (ते ही त्याला ठाऊक आहे.) आज सोन्याची खरेदी होऊं द्या --- चला." निमूटपणे मामी आणि भाचीच्या लग्नासाठी आलेल्या बेळगावच्या मावशी नारायणामागून निघतात. गल्ली-बोळातून वाट काढीत त्यांना नरहरशेटजींच्या दुकानी नारायण नेतो."आंगठीचंही इथंच .... म्हणत होते" ----- अशी कुजबुज करण्याचा मामी प्रयत्न करतात. पण नारायण ऎकायला तयार नाही."मी सांगतो ऎका --- हं नरहरशेट, मंगळसूत्र केव्हा न्यायला येऊ ---""चारपाच दिवसात या --""हें असं अर्धवट नको -- नक्की तारीख सांगा -- मला सतरा हेलपाटे मारायला सवड नाही ---" नारायण सोनारदादांना सणसणीत दम भरतो. एरवी त्याला कुत्र्याला देखील 'हाड' म्हणायची ताकद नसते. पण इथे अपील नाही. आता लग्न उभे राहिले आहे. आणि ते यथास्थित पार पाडणे हें त्याचे कर्तव्य आहे -- त्याच्यावर जबाबदारी आहे. गेल्या चार दिवसात त्याला दाढीला सवड नाही त्याला --- चार तांबे अंगावर टाकून सटकतो तो हल्ली. मंगळसूत्राची ऑर्डर दिल्यानंतर मोर्चा परत कापडदुकानी येतो. तिथे अजून मनासारखे खण सापडलेले नाहीत --- नारायण डगमगत नाही."
काकू -- मी सांगतो --- हं हे घ्या पंचवीस -- ह्यांतले निवडा आठ -- हे चार जरीचे -- हा मुलीच्या सासूला होईल ---"
"पण गर्भरेशमी असता तर --"
"काय करायचाय म्हातारीला गर्भरेशमी ?--"
सर्व बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईची चेष्टा ऎकून मनसोक्त हसतात.
"झालं --- हे साधे घेऊन ठेवा -- एक बारा --"
"बारा काय करायचे आहेत ?" काकू शंका काढतात."लागतात -- लग्न आहे सोमवारी.
त्या दिवशी बाजार बंद --- आयत्या वेळी खण काय, सुतळी मिळायची नाही वीतभर --
" नारायणाच्या दूरदर्शी धोरणाचें कौतुक होतें."हे बरीक खरं हो ! ---" कापडाचोपडाच्या खरेदीला आलेल्या घोळक्यांतली एक आत्या उद्गारते. "आमच्या वारूच्या लग्नात आठवतं ना रे नारू, विहीणबाई आयत्या वेळी अडून बसल्या नवऱ्या मुलाला हातरूमाल हवेत म्हणून -- सगळा बाजार बंद, मग नारायणानंच आणले बाई कुठूनसे," नारायण फुलतो."
क्यांपापर्यंत सायकल हाणत गेलो आणि डझनाचं बाक्स आणून आदळलं मी वारूच्या नवऱ्यापुढे --- पूस म्हटलं लेका किती नाक पुसतोस ह्या हातरूमालांनी तें ! हां ! तसा डरत नाही -- पण मी म्हणतो, आधीपासून तयारी हवी --- काय गुजामावशी ? "
"गुजामावशी आपलंही मत्त आगदी नारायणासारखंच आहे असं सांगतात आणि बारा खणांची आयत्या वेंळी असूं द्या म्हणून खरेदी होते ---"खरंच बाई पंचे घ्यायला हवे होते---"
"पंचांचं मी बघतो---तुम्ही ही बायकांची खरेदी पाहा----हां ! खण झाले, शालू झाले, आता अहेराची लुगडी---चला पळसुले आणि मंडळीत---"
"पळसुल्याकडे का जायचं ? मी म्हणत होतें जातांजातां सरमळकरांच्या दुकानी जाऊं----सरलच्या लग्नांत तिथनंच घेतलीं होतीं लुगडीं---"
"त्यावेळीं थोरले सरमळकर जीवंत होते मामी----चार वर्षांपूर्वी वारले ते---चिरंजीवांनी धंद्याचा चुथडा केला---आता आहे काय त्यांच्या दुकानात ? पोलक्याचीं छिटंदेखील नाहीत धड--"एकूण नारायणाला फक्त दुकानांची माहिती आहे असं नाही. त्याला दुकानदारांची आर्थिक-कौटुंबिक परिस्थितीहि ठाऊक असते."बरं अत्तरदाणी----आणि चांदीचं ताट अन वाटी---"मामींना ह्यापुढले वाक्य पुरेंहि न करू देतां नारायण ऒरडतो,"चांदीचा माल शेवटीं पाहूं---आधी कापडाचोपडाचं बघा. नमस्कार---"नमस्कार 'पळसुले आणि मंडळी, कापडाचे व्यापारी, आमचे दुकानी इंदुरी, महेश्वरी इ. इ.' यांना उद्देशून केलेला असतो."नमस्कार, या नारायणराव----"

"हं काकू, मामी, पटापट पाहून घ्या लुगडीं---"
" नारायण कंपनी कमांडरच्या थाटांत हुकूम सोडतो."अरे ह्यांना लुगडी दाखवा--"
"आमच्या मामेबहिणीचं लग्न आहे !"
"हो का ?" पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. "तुमचे मामा म्हणजे .."
"भाऊसाहेब पेंडसे----रिटायर्ड सबडिविजनल ऑफिसर---"
"बरं बरं बरं ! त्यांच्या का मुलीचं लग्न ?---" वास्तविक पळसुले आणि मंडळींच्या लक्षात कोण भाऊसाहेब काय भाऊसाहेब कांहीही आलेलें नाही, पण
"अरे माधव, त्यांना तो परवा नवा नागपुरी स्टॉक आलायं तो दाखव, " असे सांगून पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. बायका 'ह्या नारायणाची जाईल तिथे ओळख' ह्या कौतुकित चेहेऱ्यानीं नारायणाकडे पाहतात. नारायण पळसुले आणि मंडळींकडून तपकिरीची डबी घेऊन चिमूटभर तपकीर कोंबून आपली सलगी सिद्ध करतो."हं शालूबिलूची झाली का खरेदी ?"
"होतेय" ----नारायण पलीकडल्या दुकानात शालू खरेदी केल्याची दाद लागून देत नाही.तात्पर्य खरेदी संपते आणि निमंत्रणपत्रिकांचा विचार सुरू होतो. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अथवा तीनही भाषांमधून पत्रिका काढायचे ठरतं असते.

"इंग्रजी कशाला ?" नारायणाचा देशाभिमान जागृत होतो. शिवाय इंग्रजापेक्षा इंग्रजीवर त्याचा राग विशेष आहे. ह्या इंग्रजीच्या पेपरानेच मॅट्रिकच्या परीक्षेंत त्याला सारखे धक्के दिले होते ! वधूवरांचे फोटो द्यायचे की नाही---खाली 'आपले नम्र' ह्यांत कोणाकोणाची नावे घालायची--- छापखाना कुठला, टाईप कुठला, शाई कुठली, सारें सारें काही नारायण ठरवतो आणि बाकीचे निमूट्पणे ऎकतात."उद्या संध्याकाळी प्रुफें येतील ! नीट तपासा नाहीतर त्या अण्णूच्या लग्नांत झाली तशी भानगड नको व्हायला---"
"कसली भानगड ?" स्त्रीवर्गाकडून पृच्छा होते. धोतराने टोपींतल्या पट्टीवरचा घाम पुसत नारायण प्रत्येक लग्नांत सांगितलेली विनोदी गोष्ट पुन्हा सांगतो."अहो काय सांगू काकू---" ( ह्या काकू म्हणजे कापडखरेदीला गेलेल्या काकू नव्हेत----त्या येवल्याच्या काकू---- ह्या अंतूच्या काकू !) काकू कौतुकाने कानावरचा पदर कानामागे टाकून ऎंकू लागतात. "अहो अण्णू आपला----"" म्हणजे भीमीचा भाचा ना----ठाऊक आहे कीं---धांद्रटच आहे मेलं तें एक---" काकू कारण नसताना अण्णूला धांद्रट ठरवतात."तेच ते ! अहो त्याचं तिगस्त सालीं लग्न झालं---"
"अरे जानोरीकरांची मेहुणी दिलीय त्याला---" कुणीतरी एखाद्या प्रभाताई उद्गारतात."हें तूं सांगतेस मला ? ----- मी स्वत: ठरवलं लग्न ! मुलगी काळी आहे म्हणून नको म्हणत होता अण्णू कानाला धरला आणि उभा केला बोहल्यावर ! --- तर मजा काय सांगत होतो---त्याच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका त्यांनी छापून घेतल्या गोणेश्वर प्रेसमध्ये--- मी म्हणत होतों आमच्या हरिभाऊंच्या ज्ञानमार्ग मुद्रणालयांत घ्या--- पण नाही ऎकलं माझं--- मी म्हटलं मरा---"
"अय्या !" 'अय्या'च्या वयाची कोणी तरी मुलगी 'मरा' ह्या शब्दानं दचकून ओरडली."अय्या काय ?----भितो काय मी ?" नारायणाला अवसान येते. मी त्याला वार्न केलं होतं की, गोणेश्वर छापखाना म्हणजे नाटकसिनेमाचीं तिकिटं आणि तमाशाची हँडबिल छापणारा----तो निमंत्रणपत्रिका छापणार काय डोंबल? पण नाही---आणि तुला सांगलो काकू, पत्रिका छापून आल्या नि जोड्यानं मारल्यासारखी बसली मंडळी---""म्हणजे ?""सांगतो ! " नीरगाठं-उकलीच्या तंत्राने नारायण कथा सांगतो."---पत्रिका आल्या बरं का----पोष्टांत पडल्या----मी आपली सहज पत्रिका उघडून पहातों तर पत्रिकेच्या खाली 'वडील मंडळींच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येणेचे करावें' असं असतं की नाही ? तिथं 'तिकीटविक्री चालू आहे' ही ओळ छापलेली---"सर्व बायका मनमुराद हसतात----"जळ्ळं मेल्याचं लक्षण ! अरे लग्न म्हणजे काय शिनिमा वाटला की काय तुझ्या गोणेश्वराला---"
"सारांश काय ? पत्रिका उद्या येतील त्या नीट तपासा----नाहीतर एक म्हणतां एक व्हायचं चला मी निघतो."
"तू कुठे निघालास उन्हाचा-----चहा घेऊन जा थोडा---"
"इथे चहा पीत बसलों तर तिथे आचा-यांची आर्डर कोण देईल ? नाना तेरेदेसायाला भेटतों जाऊन."
"नाना तेरेदेसाई कोण ?"
"अग तो चोळखण आळींतला----स्वयंपाकी पुरवायचं कंत्राट घेतो तो---"
"पण मी म्हणत होते नारायणा----की आपलं एकदम चारशें पानांचं कंत्राट द्यावं---" एक उपसूचना."छे छे ! महागांत लागेल. तेरेदेसाई हा बेस्ट माणूस आहे--- चार आचारी पाठवील---वाढायचं आपण बघूं...." लगेच टोपी चढवून नारायण चोळखण आळीच्या दिशेला सायकल हाणू लागतो---आणि खुद्द लग्नाच्या दिवशीं नारायण म्हणजे डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखा मांडवात थैमान घालत असतो. आज त्याच्यावर चौफेर हल्ले होत असतात----आणि एका हातांत केळीच्या पानांचा बिंडा, बगलेत केरसुणी (बोहलं झाडायला), खिंशातून उदबत्यांचा पुडा डोकावतो आहे, एका हातात कुणाचं तरी कारटं धरलं आहे आणि तोंडानं क्रिकेट कॉमेंटरीच्या वेळीं रेडिओ जसा अविश्रांत ओरडत असतो तसा त्याच्या जिभेचा पट्टा चालू आहे."हं भटजी, ही केरसुणी---पांड्या, बोहलं स्वच्छ झाडून घे---कोण? मंगल कार्यालयाचे मॅनेजर ? मला कशाला बोलावताहेत ?


त्यांना म्हणावं इकडे या.... वसंतराव, पॅण्ट सोडून धोतर नेसा बघूं झटपट---देवक बसायला पाहिजे एव्हाना...काकू, बॅण्ड संध्याकाळी---आता सनई चौघडा--- बरोबर सात वाजतां हजर आहेतं इथं सनईवाले ! तुम्ही चिंता नका करूं--- बायकांचा फराळ आटोपला की नाही?... किल्ली ? काय हवं आहे ? ताम्हन मी देतो---किल्ली नाही मिळायची...हं---- या तेरेदेसाई---मथूमावशी, ते आचारी आले---तुम्ही चला सरळ---काय ?---टांग्याचं भाडं ?--देतों मी, तुम्ही जा.. चोळखण आळींतून इथपर्यंत रूपाया तीर्थरूपांना मिळाला होता तुमच्या---आठ आण्यावर दमडी नाही मिळाणार...हं---हे घ्या दहा आणे---चला...तुम्ही कुठे निघालां ग--- सरल, आता नाही जायचं कुठे---हं---

"प्रत्येकजण नारायणाचा सल्ला घेतं असतं---काम सांगत असतं---त्याची चेष्टाही करीत असतं---एवढं सगळं करून प्रत्यक्ष 'लग्न' ह्या घटनेंत त्याला कांहीच 'इंटरेस्ट' नसतो. कारण इकडे मंगलाक्षता वधूवराच्या डोक्यावर पडत असतांना एखाद्या कुर्यात सदा मंगलमला चार मंगलाक्षता उडवून तो एकदम जो निसटतो---तो आंत पानं मांडायला. उदबत्यांचा पुडा त्यालाच कुठे ठेवला आहे तें ठाऊक असतं---रांगोळी ओढायची दांडी त्याने नेमक्या वेळीं सापडावी म्हणून विलक्षण ठिकाणी ठेवलेली असते. त्याला सर्वत्र संचाराला मोकळीक असते. बायकामंडळीत बेधडकपणे घुसून मामींच्या ट्रंकेच्या वरच्या कप्प्यांत ठेवलेल्या कापराच्या पुड्या काढायचे लैसन नारायणखेरीज अन्यांस नसतं. तेवढ्यांत एखाद्या थोरल्या आजीबाई----"नारायणा----अरे राबतोयस बाबा सारखा---कोपभर चहा तरी घे---थांब---

" नारायणाला थांबायला सवड नसते. परंतु तेवढ्यांत शंभराच्या नोटेचे रूपये करून आणलेले असतात ते मोजायला त्याला एक पांच मिनीटं लागतात आणि काकू गळ्यांतली किल्ली काढून फडताळ उघडून 'हे एक चार लाडू आणि बशीभर चिवडा' त्याच्यापुढे ठेवतात.....आणि मग ती थोरली आजी आणि तिचा हा उपेक्षित नातू यांचा एकूण मुलाकडील मंडळी या विषयावर आंतल्या आवाजांत संवाद होतो. आजीला नारायणा बद्दल पहिल्यापासून जिव्हाळा. आईवेगळें पोर म्हणून तिने ह्याला पाहिलेला. लग्नाच्या गर्दीत बाहेर राहून नारायण मांडवाची आघाडी सांभाळीत असतो. आणि आजीबाईच्या ताब्यांत कोठीची खोली असते. गळ्यांतल्या चांदीच्या गोफांत कानकोरणें, किल्ल्यांचा जुडगा आणि यमनीची आंगठी अडकवून आजीबाई फराळाचं---आणि मुख्यत: साखर सांभाळीत असतात. साखर उपसून देण्याचें काम त्यांचे ! तेवढ्यांत पेंगुळलेली दोनचार पोरेंहि त्यांच्यापुढे गोधड्यांवर आणून टाकून त्यांच्या आया बाहेर मिरवायला गेलेल्या असतात. फक्त लग्न लागल्यावर पहिल्या नमस्काराला वधूवर आजींच्या पुढे येतात त्यावेळीं---'आजी कुठाय---आजी कुठाय----' असे हाके सुरू होतात."औक्षवंत व्हा" असा आशीर्वाद देऊन आजी गळ्यांतून खर्र असा आवाज काढून नातीच्या पाठीवरून हात फिरवतांना एक आवंढा गिळतात. नारायण चिवड्याचा बकाणा मारतो."नव-यामुलाकडील मंडळी समंजस आहेत हो चांगली---" आजी विषयाचा प्रस्ताव मांडतात. वास्तविक समंजस आहेत की नाहीत असा हा प्रस्ताव असतो."डोंबलाची समंजस !" नारायणाचा शेरा पडतो. "अग साधी गोष्ट---मी त्या मुलाच्या काकाला म्हटलं की तुमच्याकडलीं एकदा माणसं मोजा---म्हणजे पानावर बसवतांना चटचट बसवतां येतील. तर मला म्हणाला, मी मोजणी-कारकून म्हणून नाही आलों इथे---हें काय बोलणं झालं? आम्हीही बोलूं शकलों असतों---वधूपक्ष पडला ना आमचा---". नव्या को-या धोतराला हात पुसून नारायण तिथून उठतो आणि गर्दींत पुन्हा दिसेनासा होतो.

आजींना एकूण नव-यामुलाकडील्या मंडळींना रीत नाही एवढें कळतें.पंक्तींत वाढायचे काम वास्तविक नारायणाचें नव्हे. पण पाणी वेळेवर वाढायचे नाही हा एक लग्नांतल्या वाढप्यांचा शिरस्ताच आहे. बर्फ आणायला पाठवलेली मंडळी कधीही वेळेवर येत नसतात. पंगत उठत आली की बर्फ येतो. मग नारायण भडकतो आणि पाणी वाढण्याचें काम स्वत: करतो. ग्लासें, कप, द्रोण, फुलपात्रे, वाट्या जें काय हाताला लागेल तें प्रत्येकाच्या पानापुढे आदळीत---थोडें पाणी कपांत तर थोडें पानांत अशा थाटांत दणादण पाणी वाढत जातो. मधूनच श्लोकांचा आग्रह सुरू होतो. मंडळी आढेवेढे घेतात. नारायणहि 'अरे म्हणा श्लोक---हं चंदू म्हण...' असं कोणाच्या तरी अंगावर खेकसतो. [चंदू इंग्रजी नववींत गेल्यामुळे श्लोक वगैर बावळटपणा त्याला आवडत नाही. त्यांतून वधूपक्षाकडील एक फ्रॉकवाली मुलगी दोनदा-तीनदा त्याच्याशी बोललेली असते. ती आठवीत आहे---'जॉग्रफीचा स्टडी' कसा करावा हें चंदूने तिला सांगितलेलें आहे. चंदू जरासा घोटाळ्यातंच वावरत असतो. नारायणाच्या हुकुमाने तो उगीच गांगरतो आणि त्या फ्रॉकवाल्या मुलीच्या दिशेने पाहातो---ती त्याच्याकडे पाहून हसत असते.] बराच वेळ कोणीच श्लोक म्हणत नाही हें पाहून नारायण दणदणीत आवाजांत----'शुकासारिखें पूर्ण वैराग्य ज्याचें...' हा श्लोक एका हातांत पाण्याची झारी आणि दुस-या हातांत खास आग्रहाचे जिलब्यांचे ताट घेऊन ठणकावतो. श्लोकांची माळ सुरू होते---नारायण भक्कम भक्कम मंडळी पाहून जिलब्या वाढतो---पंगती उठतात----धर्माघरी भगवंतांनी खरकटीं काढलीं तसा नारायण पत्रावळी उचलायला लागतो---नोकरचाकर त्याच्या जोडीला कामाला लागतात---तेवढ्यांत नारायण पुन्हा सटकतो---आता तो वरातीच्या नादांत आहे. फुलांनी मढवलेली मोटार स्वत: जाऊन तो घेऊन येतो---बॅण्डवाल्यांना चांगली गाणीं वाजवण्याची धमकीहि देतो. रात्रीं अकराबाराच्या सुमाराला वरात निघते. नवरी मुलगी (नारायणाचीच मामेबहीण) नारायणाला वाकून नमस्कार करते---इथे मात्र गेले कित्येक दिवस इकडेधाव तिकडेधाव करणा-या हनुमंतासारखा भीमरूपी महारूद्र झालेल्या नारायणाचे ह्रदय भरून येते ! वधूवेषांत नटलेली सुमी !---- एवढीशी होती कारटी---माझ्या अंगाखांद्यावर खेळली वाढली----माझ्या हाताने नेऊन बालक मंदिरांत बसवली होती हिला---आता चालली नव-याच्या घरीं ! वरून अवसान आणून नारायण म्हणतो, "सुमे---मजेंत रहा बरं---वसंतराव अशी मुलगी मिळाली नसती तुम्हांला---हां---आय ऍम द नोईंन हर चाईल्डहूड...." भावना आवरायला नारायणाला इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो. सदैव नाकाच्या मध्यभागीं उतरलेला चष्माच साधा वर करण्याचें निमित्त करून नारायण डोळे पुसतो---- भाऊसाहेबहि विरघळतात-- वरात जाते----नारायण मांडवांतल्या एका कोचावर अंगाची मुटकुळी करून गाढ झोपतो--वरातींतली मंडळी एक दीडला परततात---कोचावर मुटकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचेंहि लक्ष जात नाही-- फक्त नारायणाची बायको आंत जाते---पिशवींतून दहा ठिगळं जोडलेलं पांघरूण काढते आणि हळूच कोचावर झोपलेल्या नारायणाच्या अंगावर टाकून पुन्हा आतल्या बायकांत येऊन मिसळते--समोरच एका बाजूला गोधडीवर नारायणाचें किरटें पोर झोपलेलें असतें----त्याच्या बाळ मुठींत सकाळी दिलेला बुंदीचा लाडू काळाकभिन्न झालेला असतो---मांडवात आता फक्त एका कोचावर नारायण आणि लांब दुस-या टोकाला मांडववाल्याचा नोकर घोरत असतात. बाकी सर्वत्र सामसूम असतें.

0 comments

Post a Comment