सोलापूर जिल्ह्यात हे लहानसे गाव आहे. सोलापूरपासून ४५ कि. मी. अंतरावर हे स्थान असून श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

अक्कलकोट हे पूर्वी संस्थान होते व ते राजधानीचे नगर होते. येथील राजे मालोजीराजे भोसले श्री स्वामी समर्थांचे अनन्य भक्त होते. अक्कलकोटच्या परिसरात श्री स्वामी समर्थांनी अनंत चमत्कार केले. विदेही अवस्था व संपूर्णतया मुक्त संचार यामुळे श्री स्वामी समर्थांच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारची गूढता असे. असे असूनही हजारो भक्त त्यांच्या दर्शनार्थ अक्कलकोटला गर्दी करीत असत.

अक्कलकोटला येण्यांपूर्वी श्री स्वामी समर्थांनी अनेक ठिकाणी भ्रमंती केलेली असल्यामुळे त्यांचा जन्म आणि पूर्वायुष्याबद्दल अनेक तर्क आहेत.

इ.स. १८७८ मध्ये त्यांनी अक्कलकोट येथेच समाधी घेतली. त्यावेळी त्यांचे वय ५०० वर्षाहूनही अधिक होते असं मानलं जातं.
नंतरच्या काळात सिद्धपुरूष म्हणून परिचित असलेले श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्यामुळेही अक्कलकोट हे भाविकांचं श्रद्धास्थान झालं आहे. अलिकडेच श्रीगजानन महाराजांनी समाधी घेतली. अक्कलकोट हे या दोन तपस्वी पुरूषांच्या वास्तव्याने पुनीत झालेले शहर आहे.

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे नाथ पंथीय घोर तप करणारे स्वामी. त्यांनी वेगवेगळे जन्म घेतले आणि ते समाधी घेऊन आजही वेगळ्या रूपात आहेत, असे भाविक मानतात. समाधी स्थळ, शिवपुरी आश्रम ही येथील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. शिवपुरी आश्रमात सातत्याने अग्नी तेवत ठेवण्याचे शास्त्र - अग्निहोत्र- जतन केले आहे.

0 comments

Post a Comment