पुन्हा एकदा मूळ विषयाकडे येतो. मराठी विरुद्ध भैय्ये असा आगडोंब का उसळला ?
राज : हे कालचं आणि आजचं नाहीए. तत्कालिक निमित्त सोडून द्या. माझं भाषण वगैरे. (थांबून) त्यातही मी काही वावगं, बेकायदेशीर बोललोच नव्हतो. या हिंदी न्यूज चॅनलच्या गुंडांना माझं आव्हान आहे. माझी अख्खी भाषणं त्यांनी चालवावीत. त्यातला बेकायदेशीर भाग शोधून दाखवावा. चॅलेंज आहे माझं. पण त्यांना माझ्या मूळ म्हणण्यात रस नव्हताच. त्यांना महाराष्ट्र-मुंबई-मराठी संस्कृती या सर्वांवर उत्तरेतल्या गुंडगिरीचा वरवंटा फिरवायचा आहे. मी मध्ये अडथळा नसतो तर... आपले सर्व नेते एकतर या भैय्यांना दबलेत तरी किंवा भागीदारीत त्यांनी महाराष्ट्र विकायचा करार तरी केलाय... मराठी विरुद्ध भैय्ये या आंदोलनाचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने हे बिहारी-उत्तर प्रदेशी पसरताहेत, त्यांचा हेतू शुद्ध नाहीए. सुरुवातीला बिचारा म्हणून येणार, मग फॅमिली येणार, मग गावातली माणसं बोलवत राहणार ... आता तुम्हीच मला सांगा, मुंबई-ठाणे-पुण्यासारख्या शहरात टॅक्सी-रिक्षा ज्या चालतात, तो टॅक्सी-रिक्षवाला कोण आहे ? त्याची आयडेन्टिटी काय आहे ? एका परमिटवर हे लोक चार-चार माणसं घुसवताहेत... ही कशाची लक्षणं आहेत ?

पण अमिताभ बच्चनवरचं-
राज : अमिताभ बच्चनपासून सुरुवात केली कारण मोठ्यांची उदाहरणं दिल्याशिवाय गोष्टी पटत नाहीत. इतक्या मोठया कलावंताला जर आपल्या प्रांताबद्दल प्रेम असेल, तर राज ठाकरे हा छोटा माणूस आहे, त्याला स्वतःच्या प्रांताबद्दल प्रेम वाटलं तर चूक काय ? मध्यंतरी मी त्यांचं एक क्लिपिंग बघितलं एका चॅनलवर... त्यात ते म्हणाले होते, ‘मैं दिल्ली रहा, कलकत्ता रहा, बम्बई रहा (मुंबई नाही!) मगर मेरी पहचान तो ’छोरा गंगाकिनारेवाला’ ही रही है।‘ याचा अर्थ काय होतो ? तुम्हाला या देशाने सुपरस्टार केलंय... उत्तर प्रदेशने नाही केलं... तुमचे चित्रपट पाहायला सर्व देशाने, ज्यात आम्ही पण आलोच... रांगा लावल्या... पण तरीही इतक्या मोठ्या कलावंताला जर आपल्या प्रांताबद्दल प्रेम वाटतं, तर मला नसणार का? का नसणार? एवढाच माझा विषय होता. यापलीकडे काहीच नव्हता...

पण मग बाळासाहेब ठाकरेंनी अमिताभना पाठिंबा देऊन तुमच्यावर अप्रत्यक्ष टीका केलीय ते काय आहे ?
राज : तुम्ही ब्याऐंशी वर्षाचे झालात की कळेल तुम्हाला.

म्हणजे ?
राज : या विषयावर मी नाही बोलणार अजून. पण एक सांगतो की, प्रबोधनकारांचंच मराठी माणसांचं महाराष्ट्राचं प्रेम बाळासाहेबांमध्ये आहे, असं पिढयांमधून आलंय माझ्यात ते. (गप्प बसतात काही क्षण)

जया बच्चन तुम्हाला ओळखत नाहीत म्हणाल्या ?
राज : त्या ’जया अमिताभ बच्चन’ नाही तर अमरसिंहाच्या समाजवादी पक्षाच्या खासदार बोलल्या. ज्यांना माझ्या जमिनी माहीत आहेत; पण मला त्या नाही ओळखणार ! मी जे बोलतोय त्यावर जया बच्चन यांच्याकडे काही उत्तर आहे का? आपल्या मेकअपमनसाठी मराठी पिक्चरमध्ये अमिताभनी तीन मिनिटांचं गाणं केलंय, ते त्यांचे महाराष्ट्रावरचे उपकार मानायचे?

तुमचं उत्तर ?
राज : छे! छे! हा काय कलगीतुरा आहे का? तुम्हा लोकांची ही कामं आहेत... आगी लावण्याची.

पण बर्‍याच मराठी लोकांना जया बच्चनांचं बोलणं संधिसाधुपणाचं वाटलं. आवडलं नाही...
राज : मग त्या लोकांनी जया बच्चन यांच्याशी बोलून घ्यावं ! (हसतात)

पण राज, आजच्या ग्लोबलायझेशनच्या जगात असं तुम्ही संकुचितपणाचं महाराष्ट्रापुरतं कसं बोलू शकता? आणि हिंसक आंदोलन? तलवारींची भाषा?
राज : पहिल्यांदा आपण हिंसकपणाबद्दल बोलू या. या भैय्यांनी इथे येउन मुंबईत, पुण्यात, नाशिकात लाठयाकाठयांची भाषा करायची, आजमगढहून वीस हजार गुंड बोलाविण्याची भाषा करायची आणि मी काय, उत्तर प्रदेश दिन, छटपूजा, लाईचना संमेलन, उत्तरायण साजरं करू? म्हणजे महाराष्ट्राला काय या भैय्यांच्या गोठयात नेऊन बांधायचंय आपण? महाराष्ट्र ही आपली भूमी आहे. इथे येऊन या भैय्यांनी लाठयांची भाषा केली, तर ताबडतोब त्यांना थांबवलं पाहिजे.

पण हे सारं राज्य घटनेच्या विरोधात नाही का? कुणालाही कुठेही देशात जाण्याची...
राज : (तोडत) काय तरी काय बोलताय तुम्ही? अहो, राज्यघटना ही एक व्यवस्था सांगणारी नियमावली आहे. आपण तिचा आदर आणि पालन केलं पाहिजेच. पण तिच्या मूलभूत तत्त्वाचं. राज्यघटनेतले तपशील बदलत असतात. अहो, घटनादुरुस्ती होत नाही का? घटनाकारांनी घटना बनवताना विचारात न घेतलेले नवे प्रश्न आज निर्माण झालेत. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आताची वेगळी आहे. तेव्हा देशाची देशातल्या शहरांची लोकसंख्या काय होती? आता काय आहे? शेवटी राज्यघटना ही देशातल्या जनतेच्या सुख, समाधान, स्वातंत्र्य व विकासासाठी आहे. लोक राज्यघटनेसाठी नाहीत. राज्यघटना लोकांसाठी आहे. आणि हा राग काय माझा एकट्याचा आहे का? शीला दीक्षितही तेच बोलल्या, मध्यंतरी प्रभा राव तेच बोलल्या, आसाममध्ये हेच बोलताहेत, हे जे पत्रकार माझ्या बद्दल गरळ ओकताहेत त्यांनी आसाममध्ये जाऊ न याच गोष्टी कराव्यात...तिथून जिवंत आले तर परत बोलू आपण...शिवाय तुमचा तो कोण अमेरिकन म्हणाला नव्हता का, प्रत्येक पिढीची घटना वेगळी असते म्हणून!

थॉमस र्जेफर्सन.
राज : तेव्हा र्जेफर्सन, आता राज ठाकरे! (हसतात) राज्यघटनेत असं लिहिलंय का की, स्थानिकाचं पोट मारून बाहेरच्या बेकारांना काम द्या म्हणून...आज माझ्याकडे एक असाच पत्रकार आला होता. तो काही वर्षे इथे राहतोय त्याला मराठी सोडाच... हिंदी पण येत नव्हतं... हे इतर प्रांतात चालेल का? इतर प्रांतात सर्व व्यवहार त्यांच्या भाषेत, त्यांच्या पाट्या त्यांच्या भाषेत, इथे मात्र मुंबई महानगरपालिकेत मराठी सोबत हिंदी आणायला बघताहेत. हे सांस्कृतिक आक्रमण आहे. हे मी होऊ देणार नाही. नाही म्हणजे नाही.

0 comments

Post a Comment