पण ते ग्लोबलायझेशनचं ?
राज : ग्लोबलायझेशनची भाषा आधी सर्व प्रांतांना शिकवा मग महाराष्ट्राला शिकवा. हीच गोष्ट तुम्ही करुणानिधी, चंद्राबाबू नायडूंना सांगा. त्या दिवशी त्या शिवाजी पार्कवर चंद्राबाबू नायडूंनी इंग्रजीत भाषण केलं. तिथल्या प्रेक्षकातल्या कुणाला कळत होती ती भाषा? चंद्राबाबूंना तेलगू, इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी शिका, हिंदी बोला असं सांगण्याची हिंमत आहे अमरसिंहाची? कुणाचीच! ग्लोबलायझेशन म्हणजे आपली भाषा, आपली संस्कृती मारून टाकणे असा होत नाही. जे इथलं-महाराष्ट्रातलं आहे, तेच ही माणसं नाकारताहेत. मारायला बघताहेत. या यु.पी.-बिहारच्या भैय्यांना माझी विनंती आहे की, हा प्रयोग त्यांनी गुजरात, तामिळनाडू, प.बंगाल, केरळ,कर्नाटकमध्ये करून दाखवावा. काय होतं ते मला येऊन सांगावं...शिवाय इतर कुणाच्याही बाबतीत असं महाराष्ट्रात होत नाही. कारण बाकी प्रांतीय महाराष्ट्रात येऊन असं करत नाहीत. सर्वत्र गरबे होतात, दांडिया होतात का नाही? आपल्याला असं वाटतं का की हे राजकीय ताकद दाखवताहेत म्हणून? शिवाय मला सांगा, महाराष्ट्रात इतर अनेक प्रांतातले नेते राहतात, गुजराती राहतात,तेलगू राहतात, तामिळी राहतात, मारवाडी राहतात, पंजाबी राहतात. आपण कुणी असं बघितलंय की त्यांनी मोबिलाइझ्‌ड होऊन त्यांच्या प्रांतातल्या नेत्यांना बोलावलंय म्हणून...किंवा त्यांच्या प्रांतातल्या नेत्यांना ते विचारताहेत कुणाला मतदान करू म्हणून...? ह्यांनाच का लागतात हयांचे नेते आणायला उत्तर प्रदेश-बिहारमधून इकडे...चीन आपली भाषा संस्कृती टिकवून आपला विकास करतोय. फ्रांस आपली भाषा-संस्कृती टिकवून आपला विकास करतोय. भारतातल्या प्रत्येक राज्याची स्थितीही तीच आहे. उपदेश फक्त्त महाराष्ट्राला?

पण कायदेविषयक आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा विकासावर त्याचा परिणाम होतोच?
राज : कायदा-सुव्यवस्था मुळातून कायमची विस्कटू नये ह्या यु.पी-बिहारवाल्यांमुळे म्हणून रस्त्यावर उतरावं लागलं एखादा दिवस. यातून सर्वांनी धडा घ्यावा. शिवाय कायदा पाळण्याला आंदोलन म्हणत नाहीत. भगतसिंगांपासून ते महात्मा गांधींपर्यंत कुणालाही आंदोलन करायचं झालं, तर कायदा तोडावा लागला. आणि आम्ही कोणता कायदा तोडला? सांगा ना मला. कायदे तोडण्याचे त्यांचे प्रकार आणि पद्धती वेगळ्या असतील. पण कायदेभंग झाला, आंदोलनं झाली की कायद्यातली त्रुटी पण कळते आणि राज्यकर्त्यांना जाग पण येते. (एकदम आठवल्यासारखं) मघाशी ते तुम्ही ग्लोबलायझेशन आणि संकुचितपणाचे दाखले दिलेत ना!

ते वेगवेगळे मुद्दे आहेत...
राज : मी ते एकत्रित घेऊन दाखवतो ना चालेल?

हं.
राज : ग्लोबलायझेशन असलं तरी अमेरिका चिनी माल थांबवतेच ना? तुमचे ग्लोबलाईज्ड अर्थमंत्री पी. चिदंबरम तामिळी वेशातच लोकसभेत येतात ना ? तुमचे ते संरक्षणमंत्री ए. के. अँटनी मल्याळी वेशातच सव्वीस जानेवारीची परेड अटेन्ड करतात ना? फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी भारतात आले की, पंतप्रधान मनमोहनसिंग शिखांना फ्रांसमध्ये पगडी वापरू देत नाहीत त्याची रदबदली करतात ना? ते भारताचे पंतप्रधान आहेत ना? मग? मलेशियात तामिळींना त्रास झाला की करुणानिधी इथून मलेशियाला दोष देतात. मग त्यांच्यासाठी म्हणून भारत सरकार मलेशियाच्या अंतर्गत व्यवहारात पडते ना? ते चालतं ना? इंदिराजींच्या हत्येला कारण ठरलेल्या खलिस्तानी आंदोलनाचा नेता खतरनाक अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचं चित्र पंजाबातल्या दमदमी टाकसाळमध्ये ’संत’ म्हणून लागतं. त्याबद्दल अतिरेकी प्रांतवाद म्हणून कुणी फार आवाज उठवत नाही ना? राजीव गांधींच्या हत्येसारख्या आरोपात गुंतलेल्या जागतिक अतिरेकी संघटनेशी ’एल.टी.टी.ई.’शी - तामिळनाडूतले सर्व राजकीय पक्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध ठेवतात ना? ते केवळ तामिळी संस्कृतीचे घटक आहेत म्हणूनच ना? अशी अनेक उदाहरणं देईन मी. हे सगळे प्रांतवादी नाहीत. यांना राज्यघटनेची दुहाई दिली जात नाही. आवरून घ्यायचं ते फक्त मी. राज ठाकरेने. का? मी महाराष्ट्राचा आहे म्हणून? महाराष्ट्राचे बाकी नेते उत्तरेसमोर ताठ कण्याने उभे न राहता गलितगात्रासारखे उभे राहतात, त्याचं हे फलित आहे. मला उत्तरेची काही पडलेली नाही, मला भैय्यांच्या मतांची काही पडलेली नाही. मला महाराष्ट्राची काळजी आहे. राज्यघटनेच्या आडून वार करू पाहणार्‍या उत्तर प्रदेश-बिहारी भैय्यांची थेरं मी, माझा पक्ष आणि महाराष्ट्रातली सामान्य जनता अजिबात सहन करणारी नाही. यापुढे अजिबात नाही! नाही म्हणजे नाही आणि राज्यघटना एका मराठी माणसाने लिहिलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांचं ऋण हे लोक मानतील की नाही?

यावरून एक प्रश्न. तुम्ही मायावतींच्या सभेच्या वेळी काही बोलला नाहीत ते ?
राज : (क्षणभर थांबून) चांगला प्रश्‍्न! तुम्हाला हे माहिताय का? महाराष्ट्रासंदर्भात. छत्रपती/महात्मा शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-मायावतींनी त्यांच्या नावाची उत्तर प्रदेशात नगरं वसवलीत. शाहू नगर, आंबेडकर नगर वगैरे. आपल्याला इथल्या नेत्यांनी शाहू ,फुले, आंबेडकरांचं नाव सांगत फक्त्त मतं मिळवलीत. महाराष्ट्रातले तीन दिग्गज मराठी समाजसुधारक नेते मायावतींनी उत्तर प्रदेशात नेले. बाकीच्या सर्व भैय्यांनी उत्तर प्रदेशातले सगळे गाळ-टाकाऊ नेते महाराष्ट्रात बोलावून आणले. मायावतींचा आणि महाराष्ट्राचा हा असा ऋणानुबंध आहे. जो महाराष्ट्राचे ऋण मानतो, त्याला मी मानतो. मला व्यक्तिगत काही नको. तुम्ही महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीला माना, ती स्वीकारा. बस. मायावतींनी तिथलं राजकाराण अजून इथे आणलेलं नाही. महाराष्ट्राची सामाजिक संस्कृती काय ते त्यांना कळलं असेल नि त्या ती उत्तर प्रदेशात नेत असतील, तर ती चांगली गोष्ट आहे. त्यांच्यावर कशाला टीका करायची? महाराष्ट्र संस्कृती नष्ट करायच्या मिषाने जे लोक येतात त्यांना आमचा विरोध आहे!

एकेकाळी हेच तर शिवसेना म्हणायची... तुमचं पुढं शिवसेनेसारखंच होणार नाही कशावरून?
राज : शिवसेना पक्षासारखं माझं होणार नाही, कारण माझ्या पक्षाचं नाव पुरेसं स्पष्ट आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राबाहेर मला जायचंच नाही. या एका राज्याचं तर भलं करू दे.. महाराष्ट्राच्या बारा कोटीमध्ये साडेदहा कोटी अजूनही मराठी आहेत. हे विसरून कसं चालेल?

शिवसेना आता एकीकडे मराठी प्रांतवाद खपवून घेणार नाही म्हणतेय तर त्याच वेळी परप्रान्तीयांना पार्सल करू असा लटका विरोध करत्येय. तुमचं मत?
राज : हा शिवसैनिकांनी ठरवायचा मुद्दा आहे. तेच ठरवतील.

त्यांची घुसमट होत असेल का? उत्तर मुंबई छप्पन उपशाखप्रमुख यु.पी.-बिहारचे आहेत. समाजवादी पार्टीच्या ज्या मुन्ना त्रिपाठीने शिवसेनाप्रमुखांवर केसेस घातलेल्या होत्या, त्याला आता शिवसेनेने सन्मान दिला...
राज : मला शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावर बोलायचं नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते काय ते ठरवतील...!

तुम्हाला या प्रकरणात अटक होईल असं वाटतं?
राज : होऊ दे. गांधीजी, नेहरु दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे जेलमध्ये राहिलेत. बाळासाहेब राह्यलेत तुरुंगात. माझ्या अनेक कार्यकर्त्यांना पकडलंय पोलिसांनी...दिल्ली महाराष्ट्रविरोधी आहे, ते मला अटक करतीलच, महाराष्ट्रातल्या मराठी स्वाभिमानाला ठेचणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. मला अटक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. मी माझा निर्णय घेईन.

काय वाटतं?
राज : कशाबद्दल?

तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड आणि त्यांच्यावर पोलिसांची दमनयंत्रणा चालली आहे
त्याबद्दल ?
राज : सरकार समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लाड करतं. त्यांना पकडत नाही. अर्थात ज्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत त्यांनाच पकडतात. पण हे दुर्दैवी आहे. माझे कार्यकर्ते शिकले-सवरलेले आहेत. त्यांना उत्तम करियर्स आहेत. शिवाय जनता उत्स्फूर्तपणे आमच्यामागे आहे. कुणाकुणाला पकडतील हे...! हे का खदखदतंय? उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांबद्दलच का खदखदतंय हे? पारशी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी लोकांबद्दल नाही वाटलं कुणाला हे. ते आक्रमक आहेत असं वाटलं नाही आपल्याला कधी ते? पण माझे कार्यकर्ते महाराष्ट्रासाठी रस्त्यावर उतरले, तर तुम्ही गुंड म्हणताय. गुंड म्हणून दाखवताय...

0 comments

Post a Comment