राजू परुळेकर : राज ठाकरेंना प्रश्न विचारण्याचा या मुलाखतीमुळे आलेला हा काही माझा पहिलाच प्रसंग नव्हे. या अगोदरही राज ठाकरेंच्या एक-दोन मुलाखती मी घेतलेल्या आहेत. त्यातली एक टेलिव्हिजनसाठीची होती. इतर एक-दोन मुलाखती जाहीर होत्या. अगदी मनातलं लिहायचं झालं तर एक लेखक आणि राजकीय विश्लेषक म्हणून अनेक दिग्गज नेत्यांच्या तिन्ही भाषांत (इंग्रजी,हिंदी,मराठी ) प्रिंट आणि टी.व्ही.साठी मी मुलाखती घेतलेल्या आहेत. परंतु ज्या काही थोडया माणसांच्या मुलाखती घ्यायला मला आवडत नाहीत त्यात राज ठाकरे येतात. याची अनेक कारणं आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंच्या ज्या काही मुलाखती घेतलेल्या आहेत, त्या माझ्या फार यशस्वी मुलाखतींपैकी मी मानत नाही. राज ठाकरे हे मूलतः अंतर्मुख माणूस आहेत. शिवाय मूडीही. त्यामुळे मुलाखत देताना त्यांच्या मनात, समोरच्या माणसाच्या मनात जे चाललेलं आहे ते जाणून घेऊन त्यावर आपल्या मनात जे काय प्रतिक्रियात्मक चाललेलं आहे, ते पाहण्याकडे कल असतो. असं झाल्यामुळे त्यांची मुलाखत सारखी तुटत राहते. ही पक्रिया सांगणं अतिशय गुंतागुंतीचं आणि अवघड आहे. पण ती तशी असते. दुसरं म्हणजे, स्वतः राज ठाकरेंना मुलाखत द्यायला फार खुशी कधीच नसते. ते चक्क थोडेसे नर्व्हसच असतात. त्यामुळे होतं काय की, त्यांच्यासारख्या माणसाच्या अंतर्मनाचा तळ कधीच उलगडत नाही. ती फक्त्त वरवरची प्रक्रिया होऊन बसते. राज यांची मुलाखत घ्यायला माझ्या नाखुशीची कारणं ही अशी. तरीही ’लोकप्रभा’चे संपादक आणि माझे मित्र प्रवीण टोकेकर यांनी ही मुलाखत घ्यायची मलाच गळ घातली. शिवाय ही मुलाखत घेताना प्रसंग, परिस्थिती आणि राज यांच्या आयुष्यातला क्षण इतका महत्त्वाचा होता की, तो क्षण पकडणं हेच कुठच्याही लेखकासाठी कौशल्याचं आणि आव्हानाचं ठरावं. झालं होतं ते असं की, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून महाराष्ट्रात येणारे भैय्यांचे लोंढे आणि अशा लोंढयांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर होणारा विपरीत परिणाम हा मुद्दा घेऊन राज यांनी संघर्ष उभा केला. सुरुवातीला हा संघर्ष शाब्दिक होता. नंतर या सार्‍या संघर्षाला रस्त्यावर उतरवणं राज यांना भाग पडलं या सार्‍यामध्ये मीडियाची भूमिका आश्चर्यकारक होती. विशेषतः हिंदी व इंग्रजी चॅनल्सची. इतक्या वर्षांच्या माध्यमांच्या आणि माध्यमांसंबंधीच्या कामांच्या अनुभवाच्या जोरावर निश्चितपणे मी असं म्हणू शकतो की, हिंदी आणि इंग्रजी चॅनल्सची भूमिका शंभर टक्के पक्षपातीच होती. हिंदी-इंग्रजी चॅनल्सना आजवर महाराष्ट्र ही आपली प्रभुसत्ता वाटत होती. तिलाच आव्हान मिळाल्यासारखं झालेलं दिसत होतं. ज्यामुळे हिंदी भाषिक मालक व पत्रकार चिडून राज ठाकरेंवर प्रहारावर प्रहार करत होते. अमरसिंहांना ’सर’ तर अबू आझमींना ’मिस्टर’ हे संबोधन देताना राज ठाकरेंना ’गुंड’ हे विशेषण वापरत होते. हा त्यांचा द्वेष राज ठाकरेंपुरता मर्यादित नव्हता. किंबहुना त्यांचा तो उद्देशच नव्हता. त्यांना मराठी भाषा, महाराष्ट्र संस्कृतीचा हा मुद्दाच मुळातून ठेचून काढायचा होता हे स्पष्ट दिसत होतं.

आयबीएन 7 चॅनेलवरचा ’मुद्दा’ सारखा कार्यक्रम असो किंवा ’न्यूज 24’ सारख्या नवख्या चॅनलवरचं या बातमीवरचं विश्लेषण असो. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आपण महाराष्ट्रीय आहेत याचा अपराधगंड यावा यासठी या सार्‍यांचे प्रयत्न चालू होते. राज ठाकरे यांचं निमित्त करून सारेच्या सारे हिंदी आणि काही इंग्रजी चॅनल्स महाराष्ट्रद्वेषाचा विखार ओकत होते. पत्रकारितेचे सामान्य संकेतही त्यांनी यासाठी गुंडाळून ठेवलेले आहेत. या सार्‍याचं निमित्तमात्र राज ठाकरे आहेत. याच वेळी मराठी पत्रकार एकतर कुंपणावर होते किंवा त्यांच्या हिंदी-इंग्रजी चॅनलवाल्या बॉसेसशी ’लॉयल दॅन द किंग’ होते. जणू आचार्य अत्रे, सी. डी. देशमुख या महाराष्ट्रात झाले होते यावरचा महाराष्ट्राचा विश्वासच उडावा असं हे वातावरण आहे. मी जेव्हा राज ठाकरेंची मुलाखत घ्यायला गेलो, तेव्हा (ही मुलाखत दोन वेगवेगळया बैठकांमध्ये सिध्द झालेली आहे.) राज ठाकरेंच्या विरोधात जवळजवळ सर्व जण होते. गुरुदास कामतांसारखे कॉंग्रेसी नेते, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंसारखे महानेते, सगळे हिंदी-इंग्रजी चॅनल्स, बहुतेक सगळी वृत्तपत्रं, विजया राजाध्यक्षांसारख्या साहित्यिक... जगच राज ठाकरेंच्या विरोधात होतं म्हणा ना ! त्यातच पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी फक्त्त मराठी चॅनल्स व मराठी वृत्तपत्र प्रतिनिधींना बोलावल्यामुळे यु.पी.-बिहारी पत्रकार-संपादकांची राज ठाकरेंबर आणि महाराष्ट्रावर आग ओकण्याची स्पर्धाच सुरू झाली. वास्तविक मराठीतही ’स्टार माझा’ चॅनल सोडला, तर निष्पक्षपणे राज ठाकरेंचं नेमकं म्हणणं लोकांपर्यंत कुणीच पोहोचवताना दिसत नव्हतं. महाराष्ट्रातल्या एका माणसाभोवती उत्तरेचा द्वेषबिंदू कधीच इतका एकवटला नव्हता मागच्या काही दशकांमध्ये. फक्त मराठी माध्यमांना आमंत्रण दिल्यामुळे भडकलेल्या हिंदी भाषिक पत्रकारांनी (हिंदी-इंग्रजी चॅनल्समधल्या) ’मीडिया एकच’ असल्याचा गिल्ला केला. मीडियामधली फुट सहन न करण्याची घोषणासुद्धा. वास्तविक इंग्रजी, हिंदी भाषिक पत्रकारांना ’मीडिया एक’ असल्याची आठवण पे स्केलपासून ते भाषिक वर्चस्ववादापर्यंत कधीच यापूर्वी झालेली नव्हती. इंग्रजी, हिंदी, मराठी माध्यमांमध्ये काम करणार्‍या पत्रकारांना एकच पे स्केल मिळत नाही. एवढंच नव्हे तर काही लाख खप असणार्‍या मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांवर काही हजार जेमतेम खप असणारे हिंदी-इंग्रजी वृत्तपत्रांचे संपादक भाषिक वर्चस्वाने कशी दादागिरी करतात याचा विसर सोयिस्कररीत्या या हिंदी भाषिक पत्रकारांना पडला! आपल्या ’मीडिया एकच’ मध्ये काम करणार्‍या व अधिक पे स्केल घेणार्‍या हिंदी-इंग्रजी पत्रकारांचे आवाहन मराठी माध्यमातल्या पत्रकारांनी झुगारले. राज ठाकरेंची फक्त निमंत्रितांसाठी’ पत्रकार परिषद यशस्वी झाली. त्या संध्याकाळी त्यांच्याच घरी या मुलाखतीचं दुसरं सीटिंग पार पडलं.
हे सीटिंग चालू असतानाच समोर टी. व्ही. वर उद्धव ठाकरेंचे, ‘परप्रांतीय मजुरांना पार्सलने परत पाठवू’, हे उद्गार झळकले. वास्तविक गेले काही महिने शिवसेना वरवर नीट दिसत असली, तरी आतून पूर्णतः विस्कटलेली आहे. उद्धव ठाकरे काही महिने शिवसेनेचं खेळणं करून आंदोलन-आंदोलन खेळत होते. ’ येता का जाऊ ?’ ’काढू का घालू ?’ किंवा ’घंटा’ या स्वरूपाची नावं या आंदोलनाची असत! राज ठाकरेंमुळे निर्माण झालेल्या वादाने देशभर विक्राळ स्वरूप धारण करण्याअगोदर उद्धव ठाकरेंनी, ‘शिवसेना ही उत्तर भारतीयांसाठी मराठी माणसांनी स्थापन केलेली संघटना आहे.’’ असे शिवसेनेचे स्वरूप केले होते. उत्तर प्रदेश दिन, उत्तरायण, लाईचना संमेलन, अल्हा गीत गायन, बिरहा यांची शिवसेनेने धूम उडवली होती. ‘मराठी प्रांतवाद खपवून घेणार नाही‘, ‘मराठी दूध तर भैय्या साखर‘, ‘सर्वांनी यावे महाराष्ट्रात सुखाने राहावे‘ अशी वचने शिवसेनेतर्फे खुद्द उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, रामदास कदम करत होते (आजही करतात). पण राज ठाकरेंनी महाराष्ट्रवाद ऐरणीवर आणल्यावर उद्धव ठाकरेंनी कडेवर घेतलेल्या भैय्याला चुचकारत मराठी माणसाला डोळा घालण्याचा हा प्रयत्न केला होता! या सार्‍या हलवून सोडणार्‍या घटनाक्रमाचे इतक्या तपशिलाने संदर्भासहित स्पष्टीकरण देण्याचे कारण हेच की, ज्या माणसाची मुलाखत आपण ’जशीच्या तशी’ वाचत आहोत, त्याची मुलाखत कोणत्या काळात आणि कोणत्या पार्श्वभूमीवर घेतली गेलेली आहे हे वाचकांना नीट स्पष्ट व्हावे. दोन्हीही सीटिंग्जच्या वेळेला राज ठाकरेंच्या घरातलं वातावरण नेहमीप्रमाणे शांत, आग्रंही आणि उत्फुल्ळ होतं. राजच्या आई मात्र चेहर्‍यावरची आणि मनातली मुलाबद्दलची चिंता लपवू शकत नव्हत्या. कुणाचाही पाठिंबा नसलेला आपला कर्ता कुलगा आता काय काय आणि कुणाकुणाला अंगावर ओढवून घेणार, याचा ताण त्यांच्या चेहर्‍यावरनं लपत नव्हता. त्याच वेळेला मुलाच्या जिगरबाजपणाचं कौतुकही. आईच ती. तर राज ठाकरे...!

0 comments

Post a Comment